नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
गेल्या काही दिवसांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांना अनेक महत्त्वाची आवाहने केली. यापैकी एक म्हणजे इधन बचतीसाठी पुढील काही महिने परदेश दौरे टाळावे, असे आवाहन केले होते. या आवाहनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः पाच दिवसांच्या परदेश दौऱ्यावर गेले आहे. यावरुन आता काँग्रेसचे खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
केंद्र सरकारच्या धोरणांवर राहुल गांधींची टीका
राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. एक्सवरील एका पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणतात की, एक भयंकर आर्थिक वादळ घोंघावत आहे. मोदींनी १२ वर्षांत जी रचना उभारली, ती केवळ अदानी आणि अंबानींसाठीच होती. आणि आता तीच रचना कोसळण्याच्या मार्गावर आहे. त्यांना काही होणार नाही. त्यांच्याकडे बाहेर पडण्याचा मार्ग आहे. तुम्हाला फटका बसेल. तरुणांना, गरिबांना, मध्यमवर्गीयांना, शेतकऱ्यांना, मजुरांना, लहान व्यावसायिकांचे नुकसान होईल, जे या रचनेचा कधीच भाग नव्हते. तुमच्या आजूबाजूला पाहा. तुम्ही त्या रचनेचा भाग आहात, की त्या वादळाचे बळी? अशी विचारणा राहुल गांधी यांनी एक्स पोस्टमध्ये केली आहे. या एक्स पोस्टसोबत शेअर केलेल्या व्हिडिओत केंद्र सरकारच्या धोरणांवर राहुल गांधी यांनी टीका केली आहे.
स्वतः जगभर दौरे करत आहे
आर्थिक मंदीचे वादळ येत आहे. अदानी आणि अंबानी ढाचा त्यांनी तयार केला आहे. तो पूर्णपणे कोसळणार आहे. दुःखद गोष्ट ही आहे की, सामान्य जनतेचे मोठे नुकसान होणार आहे. याचा अर्थ ते आपल्या महालात बसून राहतील आणि तरुणांचा याचा मोठा फटका बसेल. अदानी आणि अंबानी यांना आर्थिक झळ बसणार नाही. मोदींवर याचा प्रभाव होणार नाही. देशातील युवा, शेतकरी, कामगार, लघु उद्योगांना याचा मोठा फटका बसणार आहे. गेल्या अनेक वर्षांत झाले नाही, इतके मोठे नुकसान होणार आहे. खूप कठीण काळ येत आहे. देशातील आर्थिक समस्यांवर तोडगा काढण्याऐवजी मोदी नागरिकांना परदेश दौरे टाळण्याचा सल्ला देतात. पण, स्वतः जगभर दौरे करत आहेत. देशातील अंतर्गत आर्थिक संकटांकडे दुर्लक्ष करून केवळ प्रतिमा उभारण्यावर भर दिला जात आहे,” असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.




