मुंबई | Mumbai
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरुन प्रचंड राजकारण रंगले आहे. अजित पवार यांचा 28 जानेवारीला बारामती येथे विमान कोसळून झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. त्यापूर्वी 17 जानेवारीला शरद पवार आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत जयंत पाटील यांच्या घरी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासंदर्भात बैठक पार पडली होती, असा दावा सातत्याने शरद पवार गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आता अनेक शंका देखील उपस्थित केल्या जात आहेत. अनेकांनी हा कट असल्याचेही म्हटले. या विमान अपघाताची चौकशी केली जात असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही प्रश्न उपस्थित केला आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर विजय वडेट्टीवार यांनी मोठे विधान केले आहे. विजय वडेट्टीवार विलगीकरणाबद्दल बोलताना म्हटले की, अजित पवारांनी का कल्पना दिली नाही किंवा सांगणे आवश्यक आहे का? हा त्या पक्षाचा निर्णय आहे. भारतीय जनता पक्षाला का सांगितले नाही? किंवा त्यांना सांगितल्याशिवाय पुढचा कार्यक्रमच ठरत नाही का? मग हा पक्ष भारतीय जनता पक्ष म्हणेल, त्याच पद्धतीने चालतो का?
दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येऊ नये हा कट शिजला
ते म्हणाले, आपल्या संस्कृतीनुसार दशक्रिया झाल्यावर घरातील सुरळीत कामकाज सुरू होते. पण राज्यातील राजकारण इतके सडके झाले आहे की कसलीही वाट न बघता शपथविधीचा कार्यक्रम करण्यात आला. यातूनच दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र येऊ नये म्हणून हा कट शिजला, असा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
राजकारणात नैतिकता आणि नीतिमत्ता राहिली नाही
‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूपेक्षा दोन पक्षाच्या विलीनीकरण बाबत जास्त चर्चा झाली. यातून काही लोकांना आनंद झाला. आपल्या मोठ्या नेत्याचा मृत्यू झाल्यावर दोन चार दिवस ही नेते थांबू शकले नाही यातून राजकारणात नैतिकता आणि नीतिमत्ता राहिली नाही हे महाराष्ट्र बघत आहे’, अशी टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली.
विलिनीकरण होऊ नये अशी भूमिका भाजपची होती आणि त्यातून भाजपला नेहमी दादांच्या बरोबर राहून भाजपचा बरोबर वाटाघाटी करणारे जे नेते आहेत त्या नेत्यांची इच्छा सुद्धा नव्हती. दशक्रिया झाल्याशिवाय कुठलाही पदभार घेऊ शकत नाही. काल भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी सांगितले की इंदिराजींचा मृत्यू झाल्यानंतर लगेच पंतप्रधान राजीव गांधींची नियुक्ती झाली झाली होती.
पण, काही लोकांना कळत नाही की ते पद संवैधानिक आहे आणि पंतप्रधान पद एकही दिवस रिकामे ठेवता येत नाही. उपमुख्यमंत्री पद हे काही संवैधानिक पद नाही त्यामुळे तेराव्याचा कार्यक्रम झाल्यावर शपथविधी करता आला असता. शशिकांत शिंदे यांनीही असे सांगितले त्यांनी शपथही घेतले की चर्चा झाली होती म्हणून राजकारण हे खूप घाणेरडे झालेले आहे, सडके झालेले आहे, असेही त्यांनी म्हटले.





