सार्वमत
अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासन काळजी घेत असले तरी नगरकरांनी मात्र कोरोनाचा धोका फार गांभीर्याने घेतलेला दिसून येत नाही. शनिवारी सकाळी भाजी खरेदीसाठी चौका-चौकात अनेकांनी गर्दी केली. संचारबंदी आणि जमावबंदीचा आदेश धुडकावून नगरकर भाजी खरेदीसाठी बाहेर पडले. मग, पोलिसांनी नियम डावलणाऱ्या 60 जणांविरुद्ध भादंवि कलम 188 अन्वये गुन्हे दाखल केले आहे.
कोरोना व्हायरस हळूहळू पाय पसरत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक गडद होऊ नये म्हणून प्रशासन वेगवेगळे उपाय करत आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून वेळोवेळी सांगितले जात आहे.
तरी काही लोक विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळून येतात. अत्याआवश्यक सेवा 24 तास सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात नागरिकांना भाजीपाला सहज उपलब्ध व्हावा म्हणून महापालिकेने नगर शहरातील प्रत्येक मोठ्या चौकात विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. आज सकाळी भिस्तबाग, चितळेरोड, अमरधाम रोडवरील गाडगीळ पटांगण, मार्केट यार्ड, माळीवाडा आदी परिसरात भाजी विक्रेत्यांनी आपली दुकाने मांडली होती. भाजी खरेदी, किराणा खरेदीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी काही नियमावली ठरवून दिली आहे.
भाजी खरेदीसाठी बाहेर पडताना घरातील एकाच व्यक्तीने बाहेर पडावे, खाजगी वाहनांचा वापर करु नये. तसेच, विक्रेते यांनी ग्राहकांना पाच-पाच फुटांचे बाँक्स तयार करून द्यावे असे आदेश दिले आहे. परंतु शनिवारी सकाळी लोकांनी भिस्तबाग, चितळेरोड, अमरधाम रोड, मार्केट यार्ड, माळीवाडा येथे भाजी खरेदीसाठी गर्दी केली. भाजी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहून शहर पोलिसांनी गर्दी कमी करण्यासाठी तत्काळ पाऊस उचलले. जे लोक कुटुंबासह भाजी खरेदी करण्यासाठी बाहेर पडले होते, ज्या लोकांनी स्वतःच्या वाहनांचा उपयोग बाहेर पडण्यासाठी केला होता. अशा 60 लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये कोतवाली पोलिस ठाण्यात 22 लोकांवर तर तोफखाना पोलीस ठाण्यात 38 लोकांवर भादंवि कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.




