नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अंबड पोलीस ठाण्याचे (Ambad Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत यांनी मजामस्तीतून केलेल्या गोळीबाराच्या घटनेला महिना उलटला तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आमदार सीमा हिरे (MLA Seema Hiray) यांनी विधिमंडळात जोरदार आवाज उठवला.कोणतीही आपतकालिन परिस्थिती नसतांना पोलिस ठाण्यातच गोळीबार होतो हि घटना गंभीर असल्याने शासनाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी तातडीने उच्चस्तरीय समिती नेमून राजपूत यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आ.हिरेंनी केली आहे.
विधिमंडळात (Vidhimandal) औचित्याचा मुद्दा मांडतांना आ.हिरे म्हणाल्या की, महिनाभरापूर्वी रात्रीच्या वेळी राजपूत हे काही मोजक्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पोलीस ठाण्याच्या (Police Station) आवारात उभे होते. यावेळी राजपूत यांनी मजामस्तीतून गोळीबार केला. गोळी लागून पोलिस उपनिरीक्षक साळुंखे आणि हवालदार दत्ता धिंडळे जखमी झाले होते. या घटनेमुळे अवघ्या शहर पोलीस दलात मोठीच खळबळ उडाली होती. या घटनेला महिना उलटला तरी राजपूत यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आ.हिरेंनी विधिमंडळात जोरदार आवाज उठवला. राजपूत यांना नेमकं कोण आणि का पाठीशी घालत आहे असा सवाल करत सदरची घटना लपविण्यासाठी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजही गायब झाले असेल असा संशयही यावेळी आ.हिरेंनी व्यक्त केला.
शासनाने (Government) या प्रकरणाच्या चौकशीसाठी तातडीने उच्चस्तरीय समिती नेमून पोनि.राजपूत यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी आ.हिरेंनी केली आहे. पोनि.राजपूत यांनी अंबड पोलीस स्टेशनचा पदभार घेतल्यापासून सिडको परिसरात (Cidco Area) मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली आहे. मारामाऱ्या,तोडफोड यासह गंभीर गुन्हेही रोजच घडत आहेत. सामाजिक कार्यकर्ते,नगरसेवक आदी लोकप्रतिनिधींशी राजपूत यांची बोलीभाषा कायमच उर्मट असते. राजपूत यांच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्यांवर नेहमीच अन्याय होत आहे. यातूनच राजपूत यांच्या कार्यपध्दतीच्या विरोधात सिडकोवासियांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे आ.हिरे यांनी नमूद केले.




