नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
देशाची राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी आली आहे. दिल्लीत दहशतवादी कट उधळण्यात स्पेशल सेलला यश आले असून ISI शी संबंधित चौघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही मोठी कारवाई केली असून पंजाबमधून तिघांना तर दिल्लीतून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्ली एनसीआरमध्ये दहशतवादी हल्ला करण्याचा कट या संशयितांनी आखला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व आरोपी पाकिस्तानातील ISI हँडलर शहजाद भट्टीच्या थेट संपर्कात होते आणि त्याच्याच सूचनेनुसार काम करत होते. आरोपींच्या ताब्यातून दोन परदेशी पिस्तूल, नऊ जिवंत काडतुसे आणि पाच मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. एक मोठा दहशतवादी कट उधळून लावण्यात स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि आर्म्स अॅक्टच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून पुढील तपास केला जात आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शुभदीप सिंग, गुरजंत सिंग, साजन सिंग आणि गगनप्रीत अशी आहेत. आयएसआय हँडलर शहजाद भट्टी आणि त्याच्या साथीदारांच्या सूचनेनुसार काम केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली.
पाकिस्तानात बसलेला ISI हँडलर शहजाद भट्टी आपल्या इतर साथीदारांसह दिल्ली-एनसीआरमध्ये मोठी दहशतवादी हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत होता. यासाठी पंजाबमधील तरुणांची भरती करण्यात आली होती. तपासात असेही समोर आले आहे की, भारतीय यंत्रणांपासून वाचण्यासाठी आरोपी परदेशी मोबाईल नंबरचा वापर करत होते. हे नंबर देखील पाकिस्तानात बसलेल्यांना पुरवले होते.
मुंबई, पालघर, रायगडला पावसाचा रेड अलर्ट; कुठल्या जिल्ह्यांना हवामान विभागाचा कोणता अलर्ट?
दिल्लीतील स्पेशल सेलने दिल्ली आणि पंजाबमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले. सर्वात आधी अमृतसरच्या मजीठा रोड भागातून शुभदीप सिंग उर्फ विशालला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक सेमी-ऑटोमॅटिक पिस्तूल, पाच जिवंत काडतुसं आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान शुभदीपने खुलासा केला की, तो पाकिस्तानात बसलेल्या ISI नेटवर्कच्या संपर्कात होता आणि ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानातून शस्त्रे आणि अंमली पदार्थ मागवत असे. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचे दोन साथीदार गुरजंत सिंग उर्फ ऋषी आणि साजन सिंग उर्फ हनी यांनाही पंजाबमधून अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक असलेल्या गगनप्रीतला दिल्लीतील पोलीस ठाणे आणि धार्मिक स्थळांची रेकी करण्याचे काम सोपवण्यात आले होते. त्याला दिल्लीत गोळीबार करण्याचे निर्देशही देण्यात आले होते.




