Tuesday, August 18, 2026
Homeदेश विदेशCyclone Alert : दिवाळीत 'चक्रीवादळाचं' संकट! 'या' तारखेपासून IMD कडून हाय अलर्ट

Cyclone Alert : दिवाळीत ‘चक्रीवादळाचं’ संकट! ‘या’ तारखेपासून IMD कडून हाय अलर्ट

मुंबई । Mumbai

देशभरात दिवाळीचा उत्साह सुरू असतानाच भारतीय हवामान विभागाने (IMD) बंगालच्या उपसागरात नवीन चक्रीवादळ निर्माण होण्याचा इशारा दिला आहे. या संभाव्य चक्रीवादळामुळे किनारी भागांमध्ये मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि उंच लाटांचा धोका निर्माण होऊ शकतो.

- Advertisement -

हवामान विभागाने अंदमान-निकोबार बेटांसाठी विशेष सतर्कता जारी केली असून नागरिक आणि मच्छिमारांना पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या भागात आधीच मासेमारीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. IMD च्या अंदाजानुसार, २१ ऑक्टोबरपासून बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणाली तीव्र होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत ही प्रणाली चक्रीवादळाच्या रूपात विकसित होऊ शकते. यामुळे २३ ऑक्टोबरपर्यंत अंदमान-निकोबार द्वीपसमूहात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे.

हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “निकोबार बेटांतील काही ठिकाणी ७ ते ११ सेंटीमीटर इतका पाऊस पडू शकतो. २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील, तर काही भागांत हा वेग ५० किमी प्रतितासांपेक्षा अधिक असू शकतो.” याशिवाय, २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी द्वीपसमूहात विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, २२ ते २३ ऑक्टोबरदरम्यान अंदमान समुद्रात ३५ ते ४५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि उंच लाटा उसळतील, असा अंदाज आहे.

हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी समुद्राची स्थिती ‘धोकादायक’ असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सक्त सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरातील पाण्याचे तापमान वाढल्यामुळे या प्रणालीला अतिरिक्त ऊर्जा मिळत आहे. तज्ञांच्या मते, पुढील २४ ते ४८ तास निर्णायक ठरणार असून चक्रीवादळाचा वेग आणि दिशा यावर संपूर्ण परिस्थिती अवलंबून असेल. हवामान विभाग सतत निरीक्षण ठेवत असून, नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरा पाणलोटात श्रावणसरींचा जोर

0
भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara उत्तर नगर जिल्ह्याचे जिवनदायिनी भंडारदरा आणि निळवंडे धरण तुडूंब असून काल सोमवारी श्रावणसरींचा जोर वाढल्याने धरणातून पाणी आणखी सोडण्यात येण्याची शक्यता...