अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सरकारने वाढविलेला हमीदर, बाजारात कमी झालेली आवक आणि दक्षिण भारतातील खरीपातील कांदा बाजारात येण्यासाठी वेळ लागणार असल्याने काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होतअ असून काल सर्वाधिक भाव शेवगावात मिळाला. 1 नं. कांद्याला तब्बल 5000 रूपयांचा दर मिळाला. येथे 930 क्विंटल सर्वात उत्तम कांद्याला 2800 ते 5000 रूपयाचा दर मिळाला. भाव वाढत असल्याने शेतकर्यांमध्ये उत्साहवर्धक वातावरण असलेतरी गृहिंणींचे बजेट बिघडणार आहे.
एक नंबर कांद्याला काल अन्य बाजारात मिळालेले दर असे-कोल्हापूर 1000 ते 4000, सोलापूर 500 ते 4200 रूपये, इंदापूर 1200 ते 4300 रूपये, पुणे-मांजरीत 2000 ते 4000 रूपये, मंगळवेढा 1500 ते 4500 रूपये, वांबोरी 500 ते 4000 रूपये. दक्षिण भारतातील खरीपातील कांदा बाजारात येण्यासाठी वेळ लागणार आहे. यामुळे किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामातील कांदा, मार्च आणि एप्रिल महिन्यात साठवला जातो. ऑक्टोबरपर्यंत देशाला हा कांदा पुरतो. कर्नाटक, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशातील छोट्या खरीप पिकांची मदत मिळते. त्यानंतर ऑक्टोबरपासून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सारख्या प्रमुख राज्यातील मुख्य खरीप पीक हाती येते.
सप्टेंबर निश्चित करणार कांद्याची किंमत
महाराष्ट्रातील कांदा विक्रेत्यांच्या माहितीनुसार, येत्या हप्त्यात कांद्याच्या दरात सप्टेंबर महिन्यात आणखी भाव वाढेल की स्थिर राहिल हे स्पष्ट होईल. जर मुसळधार पावसामुळे दक्षिणेतील राज्यातील नवीन पिकांचे नुकसान होत असेल तर यामुळे किंमती वाढीसाठी दबाव येऊ शकतो. जर चांगल्या प्रतिचा कांदा बाजारात आला तर किंमती नियंत्रित असतील असा दावा त्यांनी केला.




