Friday, June 5, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : १७ जुलै २०२५ - क्रियेवीण वाचाळता..

संपादकीय : १७ जुलै २०२५ – क्रियेवीण वाचाळता..

कमी बोला आणि काम करा. कारवाईची वेळ आणू नका, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षातील बोलभांडांना नुकताच दिला तर मुख्यमंत्र्यांनीही काही दिवसांपूर्वी अशा लोकांचे कान उपटले होते. अशा लोकांची सध्या राजकारणात अजिबात कमतरता नाही. दुसर्‍या पक्षातील भोंग्यांचा उद्धार करता करता सर्वच पक्षातील भोंगे कर्णकर्कश वाजायला लागले ते त्या त्या पक्षधुरीणांच्या लक्षात आले नसेल असे संभवतच नाही. पण त्यांची फ़ौज पाळणे सर्वच पक्षांना सोयीचे वाटत असावे. बोलया बाहुल्याला चावी दिली की तो बोलायला लागतो.

- Advertisement -

तद्वतच समाजात अस्मिता पेटवणारा कोणताही मुद्दा वाचाळवीरांना सोपवला की सत्तेची गणिते जुळवायला आणि सारीपाट खेळायला सर्वपक्षीय धुरीण मोकळे होतात. त्यांनाही लोकांची नाडी चांगलीच गवसली आहे. लोक अशा मुद्यांवर पेटून उठतात आणि खर्‍या गरजा विसरून जातात. निवडून दिलेले आणि न दिलेले त्यांची लोककल्याणाची जबाबदारी पार पाडत नाहीत हे लोकांच्या लक्षात देखील येत नाही. त्यांच्या वाक्ताडनानंतर फारच गहजब झाला तर तात्पुरती चावी काढून घेतली जात असावी. उपरोक्त दमबाजी त्याचाच एक प्रकार असू शकेल का? कारण अशी कारवाई करायचीच वेळ आली तर दम देणार्‍यांची सुद्धा पंचाईत होईल हे मात्र नक्की. सर्वांना सर्व पक्षातील किमान निम्म्या लोकांची तरी तोंडे बंद करावी लागतील. तसे झाले तर सरकारला काम करावे लागेल.

लोकांना दाखवावे लागेल. त्यात कोणाला रस असू शकेल? सध्या तसेही राजकारण म्हणजे वाचाळवीरांची जत्राच बनत चालले आहे. जास्त बोलणार्‍यांची जणू स्पर्धाच भरलेली असते. वादग्रस्त राहिले की लोकांची करमणूक होते आणि मग ज्यांच्यावर कामाची जबाबदारी असते त्यांना कामही करावे लागत नाही असा हा मामला आहे. पण यामुळे काळ मात्र सोकावत आहे. तशीही लोकप्रतिनिधी बनायला अजून तरी शिक्षणाची अट राजकीय पक्षांनी ठेवल्याचे निदान ऐकिवात तरी नाही. बाहुबल आणि अर्थप्रधानता यालाच सगळे पक्ष महत्व देतात हे उघड सत्य आहे. त्यात नव्या काळात वाचातुर्याची भर पडली आहे. त्यामुळे अर्थसंपन्नता आणि वाट्टेल तसे बोलता येणार्‍यांना राजकारण सोपे वाटू लागते.

किंबहुना पक्षपप्रवेशाची हीच अलिखित अट आहे हे आता कार्यकर्तेही जाणून असावेत. त्यामुळे काही दिवसांनी याच्याही शिकवण्या सुरु झाल्या तर लोकांना नवल वाटायचे कारण नाही. मक्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे..फ असा उपदेश समर्थ रामदास स्वामींनी केला. पण तो अंगीकारणे सामान्य माणसांनाच अवघड जाते मग राजकारण्यांची काय कथा? तेव्हा उपरोक्त दमबाजी म्हणजे धूळफेकच ठरण्याची शयता जास्त आहे.

ताज्या बातम्या

केबल

Nashik Crime News: टेम्पोतून ऑईलची गळती झाल्याने पोलिसांचा संशय बळावला, अन्...

0
नाशिक | प्रतिनिधीभारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कंपनीची भूमिगत केबल चोरी करणाऱ्या टोळीचा नाशिकरोड पोलिसांनी पर्दाफाश केला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे....