मुंबई | Mumbai
विधान परिषदेच्या १७ जांगाच्या निवडणुकांसाठी गुरुवारचा (4 जून) अर्ज माघारी घेण्याचा दिवस नाट्यमय घडामोडींनी गाजला. ठाणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पुणे, अहिल्यानगर, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या मतदारसंघात मविआच्या अधिकृत उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीवर मतदानाच्या आधीच ६ जागा गमावण्याची नामुष्की ओढवली. या सर्व घडमोडीनंतर आता ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले. अर्ज मागे घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.
छत्रपती संभाजीनगर – जालना विधान परिषद तसेच कोकण विधान परिषद या दोन्ही ठिकाणाहून ठाकरे गटाच्या उमेदवारांनी माघार घेतली होती. तसेच, पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार होते. यावर खासदार संजय राऊत म्हणाले आहेत की, “विधान परिषद निवडणूकीत काल (4 जून) दिवसभर बिनविरोधची धडपड आणि त्यासाठीचे माघार नाट्य यावर एका दिवसात किमान १५० कोटी रुपये खर्च झाले. विरोधी पक्षाचे घोडे स्वतःच बाजारात आपला भाव ठरवून आले. महाराष्ट्रात यासाठी प्रचंड पैसा आहे.
संजय राऊत म्हणाले की, माघारी आणि बिनविरोध यासंदर्भात जे व्यवहार झाले, त्यासाठी १५० कोटी रुपये खर्च आले. ज्या ११ निवडणुका होणार आहे, तेथेही मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले जातात. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या लोकांना माझे असे म्हणणे आहे की, तुमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे ना, मग असे असताना तुम्ही हा घोडेबाजार का करताय ? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
पंतप्रधान मोदी म्हणतात काटकसर करा मग असे पैसे उडवायला परवानगी दिली आहे का?
मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, तुमच्याकडे जिंकून येण्याचे संख्याबळ आहे, यंत्रणा आहे, तरीही तुम्ही बिनविरोध, माघार यासाठी एवढा आटापिटा का करताय, घोडेबाजार का करताय? एका बाजूले देशाचा पंतप्रधान मोदी म्हणतात काटकसर करा, मोठे कार्यक्रम करू नका, गाड्या-घोडे उडवू नका. मग अशा प्रकारे (विधान परिषद निवडणुकांमध्ये) पैसे उडवायला परवानगी दिली आहे का? असा खोच सवाल राऊत यांनी विचारला. कोटी कोटी रुपये उडवायला परवानगी दिली आहे का, कोकणातील माघारीसाठी २५ कोटी रुपये दिले. त्यातले १५ कोटी रुपये बीकेसीतल्या एका हॉटेलमध्ये दिले, असा आरोप राऊत यांनी केला. छ. संभाजीनगरमध्येही तेवढीच रक्कम देण्यात आली. पुण्यातले आकडे तर आज प्रसिद्धच झाले आहेत. उमेदवारीच्या बदल्यात उमेदवारी देणाऱ्यांना काय दिलेय हे समोर आलेय, असे ते म्हणाले.




