अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
खरीप हंगामातील पीकविमा अर्जासाठी असलेली 31 जुलैची अंतिम मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी मुदतवाढीबाबत माहिती दिली. यामुळे राज्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा अर्ज भरण्यात अडचणी आलेल्या शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, 31 जुलैअखेर राज्यभरातून 53 लाख 74 हजार 39 विमा अर्ज दाखल झाले आहेत. गेल्या खरिपात राज्यात एकूण 93 लाख 80 हजार 734 विमा अर्ज आले होते. त्याच्या तुलनेत आतापर्यंत 57.29 टक्के अर्ज आले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या वर्षी पिक विमा योजनेत 2 लाख 23 हजार शेतकर्यांनी सहभाग घेतला होता. यंदा तो 1 लाख 54 हजार अर्जावर आहे. राज्यात पीकविमा अर्जाच्या संख्येत मराठवाड्यातील जिल्ह्यांचे वर्चस्व दिसून आले आहे. राज्यात दाखल झालेल्या 53 लाख 74 हजार 39 अर्जापैकी 50 लाख 26 हजार 685 अर्ज बिगर कर्जदार शेतकर्यांचे आहेत. कर्जदार शेतकर्यांकडून 3 लाख 47 हजार 354 अर्ज आले आहेत. एका शेतकर्याने एकापेक्षा अधिक पिकांसाठी किंवा क्षेत्रासाठी अर्ज केले आहे. त्यामुळे 26 लाख 51 हजार 789 शेतकर्यांनी योजनेत सहभाग नोंदविला आहे.
34 लाख हेक्टरला संरक्षण
राज्यात आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जाद्वारे 34 लाख 49 हजार 406 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. या क्षेत्रावरील पिकांची एकूण विमा संरक्षित रक्कम 20 हजार 133 कोटी 50 लाख रुपये आहे.




