नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Elections) भारतीय जनता पक्षाने विजयाकडे वाटचाल सुरु केली असून तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीत कमळ फुलताना दिसत आहे. आतापर्यंतच्या कलांनुसार भाजपाने ४८ जागांवर मुसंडी मारली. तर ‘आप’ला (AAP) २२ ठिकाणी आघाडी असून काँग्रेसला (Congress) भोपळाही फोडता आलेला नाही.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा (Defeat) सामना करावा लागला आहे. यात ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि माजी मंत्री सत्येंद्र जैन यांचा समावेश आहे.यानंतर आता दिल्लीच्या निकालावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एक्सवर (ट्विट) पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की,”दिल्लीत खोट्या शासनाचा अंत झाला. येथे अहंकार आणि अराजकतेचा पराभव झाला. येथे मोदी की गॅरंटी आणि मोदींच्या विकासाच्या व्हिजनवर दिल्लीकर विजयी झाले आहेत. या प्रचंड जनादेशासाठी दिल्लीच्या जनतेचे मनापासून आभार. मोदींच्या नेतृत्त्वातील भाजपाने आपले सर्व आश्वासने पूर्ण करून दिल्लीला देशातील एक नंबर राजधानी बनवण्याचा संकल्प ठेवला आहे”, असे त्यांनी म्हटले.
दिल्लीत भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण?
दिल्लीत भाजपला बहुमत मिळाल्यास मुख्यमंत्रिपदाचा (CM Post) चेहरा कोण असणार, याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. सध्या भाजपकडून परवेश वर्मा, रमेश बिधुरी,विजेंद्रर गुप्ता, वीरेंद्र सचदेवा, नुपूर शर्मा, दुष्यंत गौतम आणि अभिनेता व खासदार मनोज तिवारी यांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी समोर येत आहेत. मात्र, यामधील केजरीवाल यांना पराभूत करणारे परवेश वर्मा, दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि अभिनेता मनोज तिवारी यांची नावे आघाडीवर आहेत. त्यामुळे यांच्यापैकी कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडते हे बघणे महत्वाचे असणार आहे.