नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Elections) भारतीय जनता पक्षाने विजयाकडे वाटचाल सुरु केली असून तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीत कमळ फुलताना दिसत आहे. आतापर्यंतच्या कलांनुसार भाजपाने (BJP) ४९ जागांवर मुसंडी मारली. तर आपला २१ ठिकाणी आघाडी असून काँग्रेसला (Congress) भोपळाही फोडता आलेला नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यात ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि माजी मंत्री सत्येंद्र जैन यांचा समावेश आहे.
यामध्ये भाजपचे परवेश वर्मा (Pravesh Verma) नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून केजरीवाल यांचा पराभव करत ‘जायंट किलर’ ठरले आहेत. त्यानंतर आता भाजपमध्ये बहुमत मिळाल्यास दिल्लीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार, याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. सध्या राजकीय वर्तुळात परवेश वर्मा, रमेश बिधुरी, विजेंद्रर गुप्ता, वीरेंद्र सचदेवा, नुपूर शर्मा, दुष्यंत गौतम आणि अभिनेता व खासदार मनोज तिवारी यांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी समोर येत आहेत. मात्र, यामधील केजरीवाल यांना पराभूत करणारे परवेश वर्मा, दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि अभिनेता मनोज तिवारी यांची नावे आघाडीवर आहेत. त्यामुळे यांच्यापैकी कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडते हे बघणे महत्वाचे असणार आहे.
दरम्यान, भाजपने यापूर्वी १९९३ मध्ये ४९ जागा जिंकल्या होत्या आणि ५ वर्षांत ३ मुख्यमंत्री (CM) बनवले होते. यामध्ये मदनलाल खुराणा, साहिब सिंग वर्मा आणि सुषमा स्वराज यांचा समावेश होता. तिन्ही नेत्यांची मुले आणि मुली दिल्लीच्या राजकारणात सक्रिय आहेत. खुराणा यांचे पुत्र हरीश खुराणा मोती नगर येथून निवडणूक लढवत आहेत, तर साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र परवेश वर्मा नवी दिल्ली येथून निवडणूक (Election) लढवत विजयी झाले आहेत. तर सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज या नवी दिल्लीच्या खासदार आहेत.