बीड । Beed
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील सात आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली जात आहे. तर एक आरोपी अद्याप फरार आहे. या प्रकरणानंतर बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली. बीडला हादरवून टाकणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, बीडमध्ये येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट इशारा दिला.
आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात शिंपोरा ते खुंटेफळ योजनेतील बोगद्याच्या कामाचे आणि श्री मच्छिंद्रनाथ समाधी मंदिर बांधकामाचे भूमिपूजन पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह आमदार सुरेश धस, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील आणि अनेक नेते उपस्थित होते.
संतोष देशमुख यांच्या हत्येसारख्या घटना कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत. कोणीही असो प्रत्येकावर कारवाई होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो. माझी बीडच्या जनतेला विनंती आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जातींनी एकत्र करुन स्वराज्याचा स्थापना केली. आपल्यालाही अशाच प्रकारे सर्वांना एकत्र नांदायचे आहे आणि एक नवीन बीड आपण तयार करु, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
बीडचा जो इतिहास सुरेश धस किंवा पंकजा मुंडेंनी सांगितला इतकी मोठी लोक आपल्याला बीडने दिली आहेत. तोच इतिहास पुढे जाईल आणि एक गौरवशाली बीडचा इतिहास तयार करण्यासाठी आपल्या सर्वांचे जे प्रयत्न आहेत, त्या प्रयत्नांच्या पाठीशी मी देखील ठामपणे उभा राहिन, इतकंच या निमित्ताने सांगतो, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.