दिल्ली | Delhi
अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या भीषण विमान दुर्घटनेनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने एअर इंडियावर मोठी कारवाई करत तात्काळ तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना पदावरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेत तब्बल २७० हून अधिक जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
दुर्घटनेनंतर झालेल्या प्राथमिक चौकशीत फ्लाइट क्रू शेड्युलिंगच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे समोर आले. त्यामुळे DGCA ने संबंधित दोषी अधिकाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. हटवण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये डिव्हिजनल व्हाइस प्रेसिडेंट चुरा सिंह, क्रू शेड्युलिंगच्या मुख्य व्यवस्थापक पिंकी मित्तल आणि प्लॅनिंग प्रमुख पायल अरोरा यांचा समावेश आहे.
DGCA च्या तपासात आढळून आले आहे की, क्रू मेंबर्सची तैनाती करताना वैध नियम पाळले गेले नाहीत. लायसेन्सिंग, विश्रांतीचा कालावधी, तसेच देखभाल व्यवस्थेतील त्रुटी यामध्ये गंभीर निष्काळजीपणा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही सर्व प्रकरणे एव्हिएशन सेफ्टी प्रोटोकॉलच्या विरोधात आहेत.
२० जून रोजी जारी केलेल्या आदेशात DGCA ने एअर इंडियाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की, संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ हटवावे व त्यांच्याविरोधात विभागीय कारवाई सुरू करून १० दिवसांच्या आत अहवाल सादर करावा. तसेच, पुढील आदेश येईपर्यंत या अधिकाऱ्यांना कोणत्याही नवीन पदावर नेमू नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय DGCA ने एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. ही नोटीस १६ व १७ मे २०२५ रोजी बेंगळुरूहून लंडनला जाणाऱ्या AI 133 या विमानसेवांसाठी आहे. या दोन्ही फ्लाइट्सने निश्चित वेळेपेक्षा १० तास अधिक कालावधी उड्डाण केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. सात दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याचे आदेशही एअर इंडियाला देण्यात आले आहेत.
अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर DGCA ने दाखवलेली तत्परता आणि कडक कारवाई ही देशातील हवाई सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यापुढे अशा दुर्घटनांचा पुनरावृत्ती टाळण्यासाठी विमान कंपन्यांनी नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक ठरणार आहे.





