नाशिक | किशोरकुमार दीक्षित
दरवर्षी कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशी हा आजचा दिवस धनत्रयोदशी किंवा धन्वंतरी त्रयोदशी म्हणून साजरा केला जातो. दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवाची ही सुरुवात आरोग्य, आयुष्य आणि संपन्नतेच्या मंगल प्रार्थनेने केली जाते.
धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. समुद्रमंथनातून अमृतकलश हाती घेऊन ते प्रकट झाले, अशी कथा पुराणांमध्ये सांगितली जाते. ते वैद्यकशास्त्राचे देव मानले जातात. म्हणूनच या दिवशी आरोग्यसंपन्न आयुष्याची कामना केली जाते. धन्वंतरी देवाचे पूजन करून आयुर्वेदाचे महत्त्व अधोरेखित केले जाते.
धनत्रयोदशीला लोक घरातील सोने-चांदी, धन, नाणी, नवीन भांडी किंवा धातूच्या वस्तू खरेदी करतात. हे धनलक्ष्मीचे स्वागत मानले जाते. लक्ष्मीदेवी आणि कुबेर यांची पूजा करून आर्थिक स्थैर्य आणि सुख शांतीची कामना केली जाते.
शास्त्रीयदृष्ट्या या काळात वातावरण ऋतू बदल सुरू असतो. शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी स्वच्छता, आहार आणि औषधोपचार यांचे पालन आवश्यक असते. म्हणूनच धनत्रयोदशीचा दिवस आरोग्यवर्धनाचा संदेश देतो.
आध्यात्मिक अर्थाने धनत्रयोदशी म्हणजे धन म्हणजे केवळ संपत्ती नव्हे, तर आरोग्य, मनशांती आणि दैवी श्रद्धा यांचा संगम आहे. श्रद्धेने केलेली पूजा आणि दान हेही या सणाचे विशेष लक्षण आहे. अशा रीतीने धनत्रयोदशी हा केवळ खरेदीचा दिवस नसून, आरोग्य, संपन्नता आणि जीवनातील संतुलन साधणारा सण आहे. जो दिवाळीच्या प्रकाशमय आनंद यात्रेची मंगल सुरुवात ठरतो.





