अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महापालिकेचा कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांच्या तपासाला वेग आला असून, या प्रकरणात आतापर्यंत एकूण 13 संशयित आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यापैकी 11 जणांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील 11 आरोपींना सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यापैकी युनूस खानसाहेब शेख याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून, उर्वरित 10 आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन पसार संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
धीरज परदेशी हे मुकुंदनगर परिसरातील दर्गा दायरा येथे पथदिव्यांच्या दुरूस्तीचे काम करीत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच 9 ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयित आरोपींच्या अटकेस सुरूवात केली. या प्रकरणातील मुख्य संशयित मुस्तकीम ख्वाजामिया सय्यद, मेहराज इब्राहिम सय्यद आणि सिराज इब्राहिम सय्यद (तिघेही रा. आलमगीर, भिंगार) यांना पोलिसांनी हैदराबाद येथून ताब्यात घेतले. या तिघांना पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपावरून ख्वाजामिया उर्फ अकरम याकुब सय्यद (रा. आलमगीर) आणि वसीम रहिम सय्यद (रा. फकीरवाडा, मुकुंदनगर) यांनाही नगरमधून अटक करण्यात आली.
महापालिकेचा वायरमन युनूस खान याचाही या प्रकरणाशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर मुख्य संशयित तिघांना इम्रान सय्यद याने मदत केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याने त्यालाही अटक करण्यात आली. यानंतर पोलिसांनी आणखी चार संशयितांना अटक केली. हे चौघेही घटनेच्या वेळी मुख्य संशयित आरोपींसोबत घटनास्थळी उपस्थित असल्याचा आरोप आहे. तसेच घटनेच्या वेळी आणि त्यानंतर मुख्य संशयितांना मदत केल्याचे तपासात समोर आले आहे. जाहीद नुसरत शेख (वय 21), आरमान लियाकत सय्यद (वय 21), हुजैफ साजिद शेख (वय 21) आणि मोहम्मद रशाद इम्रान सय्यद (वय 21, सर्व रा. मुकुंदनगर) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.
कटाचा सूत्रधार शोधणार
सोमवारी अटकेतील 11 आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. गुन्ह्यात वापरण्यात आलेले मोबाईल, दुचाकी अद्याप जप्त करायची आहे. तसेच आरोपींनी संगनमताने कट रचून हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, या कटामध्ये आणखी कोणकोण सहभागी होते आणि त्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी आरोपींकडे सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला.




