Friday, May 3, 2024
Homeनगरदिव्यांगांना आवश्यक लाभासाठी गावोगावी सर्वेक्षण करा

दिव्यांगांना आवश्यक लाभासाठी गावोगावी सर्वेक्षण करा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जीवन जगत असताना दिव्यांग बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु अत्यंत आत्मविश्वासाने दिव्यांग जीवन जगत असून त्यांच्या जीवनातील दु:ख आणि वेदना दूर करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. दिव्यांगांना आवश्यक असलेल्या लाभासाठी गावोगावी सर्वेक्षण करावे, असे प्रतिपादन दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी अभियानचे अध्यक्ष आणि मुख्य मार्गदर्शक आ. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले.

- Advertisement -

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी या अभियाना अंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण राधाकिसन देवढे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आ. कडू म्हणाले, दिव्यांगांच्या कल्याणासाठी गेली 15 वर्षापासून सातत्याने काम करत आहे. दिव्यांगांना त्यांच्या अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात येणे शक्य होत नसल्याने दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी हे अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान केवळ कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता प्रशासनाने दिव्यांगांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेत आठवड्यातील एक दिवस दिव्यांगांच्या अडचणी सोडविण्यासाठी राखीव ठेवावा. जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांना युडीआयडी ओळखपत्र व आधार ओळखपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम राबवावी. मुकबधीर मुलांच्या शाळांकडे विशेष लक्ष देताना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सुचना आ. कडू यांनी दिल्या.

प्रास्ताविकात सहायक आयुक्त समाजकल्याण देवढे म्हणाले, दिव्यांगांच्या विशेष शाळा, कार्यशाळा व अनाथ दिव्यांग मतिमंद मुलांसाठी 21 बालगृहे असून त्यामध्ये 1 हजार 1147 दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने गत पाच वर्षामध्ये दिव्यांगासाठी एकुण तरतुदीच्या पाच टक्के निधीची तरतुद करण्यात येऊन 3 कोटी 48 लक्ष रुपये दिव्यांगांच्या कल्याणासाठी खर्च करण्यात आले. महापालिका तसेच नगर परिषद, पंचायत समित्यामार्फतही पाच टक्के निधी राखीव ठेवत तो दिव्यांगांच्या कल्याणासाठी खर्च करण्यात आाला आहे. यावेळी आ. कडू यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना प्रातिनिधीक स्वरुपात शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला.

विविध विभागांचे मदत कक्ष

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी कार्यक्रमस्थळी विविध विभागांच्या मदत कक्षाची उभारणी करण्यात आली होती. विभागांच्या असलेल्या विविध योजनांची माहिती उपस्थित दिव्यांगाना या कक्षाच्या माध्यमातून देण्यात आली. तसेच योजनांच्या लाभासाठी येणार्‍या अडचणींची सोडवणूक या कक्षातून करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या