राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
जिल्ह्यातील आदिवासी समाजासाठी खावटी योजनेतून पहिल्या हप्त्यापोटी 5 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती ना. प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
जिल्ह्यातील 28 हजार आदिवासी लाभार्थी कुटुंबियांना या खावटी योजनेचा लाभ होणार आहे. राहुरी तालुका तसेच मतदारसंघातील नगर व पाथर्डी तालुक्यातील आदिवासी समाजातील कुटुंबांना राज्य शासनाच्या खावटी योजनेतून 2 हजार 427 लाभार्थी यांना रुपये 48 लाख 54 हजार निधी मंजूर करण्यात आल्याचे ना. तनपुरे यांनी सांगितले.
खावटी योजना आदिवासी समाजासाठी असून महाविकास आघाडी सरकारने खावटी योजना करोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सुरु केली असून राज्यातील आदिवासी कुटुंबास या योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे.
लवकरच या योजनेचा पहिला हप्ता रुपये 2000 प्रमाणे लाभार्थांच्या खात्यावर जमा होणार आहे. करोनाच्या परिस्थितीत आदिवासी समाजास मोठा फटका बसला आहे. त्यातून सावरण्यासाठी या योजनेचा लाभ मिळाल्यामुळे मदत होणार आहे.