अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगर जिल्ह्यातील मोठी शिक्षण संस्था असणार्या जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेची नोकर भरती गेल्या काही काळापासून गाजत आहे. या नोकर भरतीची माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने चौकशी सुरू असतांना संस्था पातळीवर निवड करून ठेवलेल्या उमेदवारांवरून संचालक मंडळात गट-तट पडल्याचे दिसत आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत एका ज्येष्ठ संचालकांनी संस्थेच्या नोकर भरतीसाठी आता माध्यमिक शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलमार्फत एकास एक उमेदवार द्यावा, अशी मागणी केली आहे. यामुळे संस्था पातळीवरून करून ठेवण्यात आलेली नोकर भरती एका प्रकारे रद्द झाल्याचे सांगण्यात येत असून संस्थेच्या नोकर भरतीत नवीन ट्विस्ट आला आहे.
जिल्हा मराठा शिक्षण संस्थेची नोकर भरती गेल्या काही दिवसांपासून चांगलीच गाजत आहे. या ठिकाणी 250 जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. ऐवढ्या मोठ्या प्रमाणात भरती असल्याने सर्वांना आपआपला ताकदीनूसार कोठा निश्चित केला असल्याची चर्चा असून यासाठी स्थानिक पातळीवर उमेदवार निश्चित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या भरतीबाबत थेट पोलिस प्रशासनाकडे तक्रार झाली. मात्र, हा विषय शिक्षण विभाग (माध्यमिक शिक्षण विभाग) यांच्या अखत्यारित येत असल्याने पोलिसांनी भरतीचा विषय शिक्षण विभागाकडे सरकावला. भरतीचा विषय संवेदशील असल्याने माध्यमिक शिक्षण विभागाने देखील लगेच तीन उपशिक्षणाधिकार्यांची चौकशी समिती नेमून जिल्हा मराठा शिक्षण संस्थेची नोकर भरती प्रक्रियेची चौकशी सुरू केली आहे.
ही चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी नगरला जिल्हा मराठा शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत एका ज्येष्ठ संचालकांनी संस्थेच्या नोकर भरतीत माध्यमिक शिक्षण विभागाने एकास एक उमेदवार देवून भरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी त्यांची लेखी स्वरूपात मागणी संचालक मंडळाच्या बैठकीत केली आहे. यामुळे संस्थेच्या पदाधिकारी व अन्य मंडळींनी केलेली त्यांच्या पातळीवरील भरती एका प्रकारे रद्द करावी लागणार आहे. याबाबत संस्थांच्या संचालकांकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी यास दुजोरा दिला आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी संस्थेचे सचिव अॅड. विश्वासराव आठरे पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मी बैठकीत असून या विषयावर नंतर बोलतो, असे सार्वमतला सांगितले.




