विद्यार्थ्यांचे शिक्षण करण्याचे अनेक मार्ग आहेत. औपचारिक शिक्षणात विविध विषय घेऊन विद्यार्थी शिकत असतात. मात्र विद्यार्थ्यांचे शिकणे परीणामकारक व प्रभावी होण्यासाठी प्रत्येक विषयाचे मुलभूत स्वरूपातील कौशल्य प्राप्त करण्याची निंतात गरज असते. ती कौशल्य योग्य पध्दतीने आणि अर्थपूर्णतेने साध्य झाली तर शिकणे अधिक उत्तमतेने होते. शिक्षणात गुणवत्ता जेव्हा नसते आणि विद्यार्थी जेव्हा योग्य गतीने आणि अर्थपूर्णतेने शिकत नाहीत याचा अर्थ त्यांची मुलभूत स्वरूपातील कौशल्यांच्या विकासाता अडथळे आले आहेत असे समजले जाते.
मात्र मुलभूत कौशल्यांवरती भर न देता केवळ पुस्तकातील पाठ आणि कविता शिकवत बसलो तर त्याचा फारसा लाभ होत नाही. त्याच बरोबर शिकविले गेले तरी त्याच्यातून काही साध्य होण्याची शक्यता नसते म्हणून शिक्षणाचा प्रवास सुलभ करायचा असेल तर विद्यार्थ्यांसाठी पायाभूत कौशल्यांचा विचार करण्यात आला आहे. शिक्षणाची गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी शासनही अध्ययन स्तराची निश्चिती करूनच शिकण्याचा प्रवास सुरू करावा असे सांगत आहे. तो अध्ययन स्तर म्हणजे केवळ कौशल्यांचा स्तर जाणणे आहे. तो स्तर न जाणता आपण शिकविणे सुरू ठेवले तर वैदयकीय परीभाषेत जसे म्हटले जाते की, शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि रूग्न दगवला तसा धोका शिक्षणातही असतो.
आधी स्वतःकडे पहा..
आपल्या पूर्वजांनी शिक्षणाचे अनेक मार्ग त्यांच्या तत्कालीन जीवन प्रवासात अधोरेखित केले होते. त्यांच्या तत्वज्ञानाच्या मांडणीत शिक्षण हा विषय नव्हता मात्र तरी सुध्दा वर्तमानात आपल्याला शिक्षणाचा प्रवास गतीमान करायचा असेल तर त्यांच्या त्या मांडणीत असलेले तत्कालीन विचार आजही महत्वाचे ठरतात. खरेतर सातशे वर्षापूर्वी शिक्षणही तसे फार गतीमान झाले नव्हते. अशा परीस्थित आपण वर्तमानात जे काही पेरू पहातो आहोत तो विचार त्यांच्या तत्वज्ञानात दिसून येतो. त्यांच्या तत्वज्ञानात असे बरेच काही आहे.ती मांडणी जीवन तत्वज्ञानाची आहे मात्र ते तत्वज्ञान शिक्षणाला देखील लागू होताना दिसते. मुळात शोध घेण्याचा प्रयत्न केल्यावर असे बरेच मिळत जाते. त्यांनी मांडणी केलेला विचार हा शिक्षण तत्वज्ञानाचा नाही. माणसांच्या प्रगतीची पाऊलवाट निर्मितीच्या प्रयत्नाचा तो विचार आहे.
खरेतर आपल्या जीवनाचा पाया हा भाषेवरती उभा आहे.आपण काही शिकत असलो, कोणत्याही विषयाची पदवीधारण करीत असलो तरी त्या विषयाची गुणवत्ता प्राप्त करण्याची, त्यातील ज्ञान संपादन करण्यासाठी भाषा हेच एकमेव साधन आहे. भाषेशिवाय आपण गुणवत्तेचा विचार करणे चुकीचे ठरेल म्हणून प्राथमिक स्तरावरती भाषेच्या मुलभूत कौशल्यांवरती अधिक भर दिला जातो. अभ्यासक्रमातही प्राथमिक स्तरावरती विद्यार्थ्यांमध्ये श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन कौशल्य अधिक उत्तोमत्तम स्वरूपात रूजविण्यासाठीचा विचार प्रतिपादन करण्यात आला आहे. ती कौशल्य साध्य व्हावीत म्हणून शाळा स्तरवरती सहशालेय उपक्रमाची अधिक समावेश आहे. आपण आज जे काही कौशल्य विकाससाठी प्रयत्न करतो आहोत, त्याचे कारण तो मुलभूत स्वरूपातील विचार आहे. एकूण कौशल्यांचा विचार आपण जेव्हा करतो आहोत तेव्हा प्रथम कौशल्य हे श्रवणाचे आहे.
घर हीच शाळा…
चारही कौशल्य जर आपल्याला विकसित करायचे असतील तर त्याचा पाया श्रवण हाच आहे. श्रवण कौशल्य जितके उत्तम स्वरूपात विकसित होईल तितक्या मोठया प्रमाणावर भाषेची समज उंचावत जाणार आहे. ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायातील पहिली ओवी श्रवणाचे महत्व अधोरेखित करते आहे. भाषेच्या चारही कौशल्यातील पहिले दोन कौशल्य ही बालक जन्माला आल्यानंतर घरच्या परीसरातून विकसित होण्यास आरंभ होत असतो. तर शाळेत प्रामुख्याने वाचन आणि लेखनावरती भर दिला जातो. त्यासाठी अधिकाधिक प्रयत्नही केले जातात. अर्थात वाचन, लेखन ही कौशल्य गतीमान करायची असतील तर श्रवणावरती देखील अधिक काम करण्याची गरज शाळेतही असते. बालकाला जितके म्हणून विविध अनुभव श्रवणाच्याव्दारे दिले जातील तितकी गुणवत्ता उंचावण्यास मदत होणार आहे. श्रवण हा भाषा शिक्षणाचा पाया आहे.
जीवनात यशाचे शिखर गाठायचे असेल तर अधिकाधिक श्रवण अनुभव घ्यायला हवे असे अनेक महापुरूष सांगत आले आहेत. शाळा स्तरावरती विचार केला तर अभ्यासक्रमाचा विचार करता बालकांच्या विकासासाठी गाणी, गोष्टी सांगितल्या जाण्याचा विचार अधोरेखित करतात. गाणे, गोष्टी, कथा मुलांना सातत्याने ऐकविण्याचा नियोजन असते. या गाणे गोष्टी म्हणजे वेळेचा अपव्यय नाही. त्यातूनच म्हणजे एकप्रकारे बालकांचे शिक्षण घडत असते. या स्तरावरती बालकांच्या कानावरती जितके समृध्द श्रवणाचे अनुभव पडतील तेवढया मोठया प्रमाणावरती विद्यार्थ्यांची भाषा समृध्द होत जाणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांचे भाषण कौशल्याची वृध्दी होईल, त्याच बरोबर लेखनासाठीची अभिव्यक्ती कौशल्य, स्वतःचे मत योग्य त्या शब्दात मांडणी करणे. विचार करणे, नवनविन शब्दांची भर टाकून बोलणे आणि लिहिणे या सारख्या अध्ययन निष्पत्ती देखील श्रवण कौशल्याच्या पायावरती अवलंबून असणार आहे.
मैदानांची वाट हवी..
बालकांना जर श्रवण कौशल्यासाठी विकासाची संधी मिळाली नाही, त्या स्वरूपाचे अनुभव दिले गेले नाही तर भविष्याचा पाया कच्चा राहाण्याची शक्यता अधिक आहे. आपण अंगणवाडी, बालवाडीच्या स्तरावरती प्रत्यक्ष वाचन, लेखव शिकवत नाही. किंबहूना तसा विचार अभ्यासक्रमात देखील करण्यात आलेला नाही. मात्र दुर्दैवाने या स्तरावरती मुळतः श्रवण व भाषण कौशल्यासाठी काही संधी व अनुभव देण्याऐवजी आपण नको त्या वयात बालकांवरती चुकीचे काही लादत आहोत. त्यामुळे शारीरिक क्षमता नसलेल्या विद्यार्थ्यांवरती वाचन, लेखन लादून त्यांच्या भविष्यातील विकासाची चाके गतीहीन करण्याकडे घेऊन चाललो आहोत. त्या स्तरावरती मुलांना श्रवणासाठीच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न झाला तर समाजातील संवादाच्या अभावी आणि गोंधळामुळे निर्माण होणारे प्रश्न सुटू शकतील.त्याच बरोबर शिक्षणातील गुणवत्तेचे प्रश्न देखील सुटण्यास मदत होऊ शकेल.
राज्यातील बालकांच्या विकासाकरीता निर्माण करण्यात आलेल्या अभ्यासक्रमावरती नजर टाकली तरी त्यातही श्रवणाच्या संदर्भाने विविध कौशल्य विकसित करण्याचे उददीष्टे राखण्यात आले आहे. लक्षपूर्वक ऐकणे हे देखील एक उददीष्टे आहे. विद्यार्थ्यांच्या श्रवण कौशल्यात ऐकण्याची प्रक्रिया आहे पण त्यातही टप्पे निर्धारित केले आहे. आपल्याला संवाद घडवायचा असेल तर त्या संवादात संवाद कर्ता आणि ऐकणारा यांच्यात सुयोग्य संवादासाठी श्रवण कौशल्य खूप महत्वाचे आहे. जर संवादकर्ता जो व्यक्ती आहे त्याने जो संदेश पाठविला आहे. त्यातील भावार्थ नेमकेपणाने समोरच्याच्या मनात जर पोहचला नाही तर संवाद अर्थपूर्ण घडण्याची शक्यता नाही. संवाद घडण्यासाठी श्रवण कौशल्य उत्तम असावे लागते. ऐकलेला प्रत्येक शब्द आणि वाक्याचा योग्य अर्थ समजावून घेतला नाही तर संवादात गोधळ उडण्याची शक्यता अधिक असते.
तुम्ही फक्त इतकेच करा..!
अनेकदा संवादकर्ता एखादे वाक्य उच्चारतो तेव्हा त्यातील एखादा शब्दावर स्वराघात देत असतो. खरेतर वाक्य वाचतांना आपण स्वर, लय, गती, स्वराघात या गोष्टींना प्राधान्य देत असतो. त्यानुसार संवादकर्ता कोणत्या शब्दावरती स्वराघात करतो त्यावर त्या वाक्याचा अर्थ अवलंबून असतो. मात्र श्रवणकर्त्याला ते नेमकपणाने जाणता आले तरच श्रवण झाले असे म्हणता येईल. परवा परवा कोणी तरी म्हणाले नविन “वर्षाच्या” शुभेच्छा तर यातील वर्षात नविन साल असा अर्थ अपेक्षित आहे. मात्र श्रवणकर्त्यांने जर त्याचा अर्थ पावसाळा असा जाणला तर त्यातील श्रवण उत्तम कसे होणार हा खरा प्रश्न आहे. श्रवणातील दोषामुळे शिकणे देखील सुयोग्य होत नाही. जोवर पाठयपुस्तकाती आशय नेमकेपणाने विद्यार्थ्यांच्या हदयात पोहचत नाही तोवर आशयाचा अर्थ उलगडून जाणून घेणे अवघड आहे.
त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी देखील जीवनात आपल्याला जर सुख हवे असेल तर अवधान देऊन ऐकण्याची गरज व्यक्त केली आहे.
तरी अवधान एकले देईजे / मग सर्व सुखासी पात्र होईजे
हे प्रतिज्ञोत्तर माझे / उघड आईक //9//1
आत्मनिर्भयतेच्या दिशेने..
आपण अभ्यासक्रमात लक्षपूर्वक ऐकणे असे उददीष्ट निश्चित केले आहे. ते साध्य झाले की शिक्षणाचा प्रवास योग्य गतीने सुरू झाला असे समजावे. यातील अवधान असेल तर बालकांना शिक्षणातील आणि अगदी पालकांना देखील आपल्या जीवनातील प्रवास सुयोग्य दिशेने करणे शक्य आहे. आपण अवधान कसे देतो त्यावर भविष्य अवलंबून असणार आहे. अर्जूनाला झाडाला लटकवलेल्या पोपटात फक्त डोळा दिसत होता. त्याप्रमाणे घडले तर गुणवत्तेचा प्रश्न कायम स्वरूपी संपुष्टात येण्याची शक्यता आहे. माऊली आपल्याला अभिवचन देता आहेत की तुम्ही जर अवधान, लक्षपूर्वक ऐकल तर जीवनातील सर्व सुख तुमच्या दारात आल्याशिवाय रहाणार नाही. त्यासाठी ते जणू वचन श्रोत्यांना देऊ पहाता आहेत.त्यामुळ संताच्या ओव्या, अभंगात देखील शिक्षणासाठीचा विचार प्रतिबिंबीत होतो का? असा प्रश्न पडतो…
आणि मग अशा काही ओव्या हाती आल्या की त्यातील शैक्षणिक तत्वज्ञान दिसू लागते.. आपण केवळ अध्यात्म्याच्या अंगाने विचार करून संताचे साहित्य जाणून घेतले तर संत साहित्य केवळ पूजे पुरते उरेल. मात्र त्या पलिकडे त्यातील दृष्टीकोन समजावून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्यालाही आपल्या जीवनात त्याचा उपयोग करून यशाच्या शिखरावरती जाता येईल. त्यासाठी श्रवणावरती काम करण्याची निंतात गरज आहे. त्यासाठी कोणत्या स्वरूपातील अनुभव देता येतील त्याचे निर्धारण करून मार्गक्रमन करण्याची गरज आहे.
_संदीप वाकचौरे
(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)




