मुंबई | Mumbai
राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्लीचा दौरा केला. बुधवारी, रात्रीच्या सुमारास एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाले होते. एकनाथ शिंदे यांच्या या अनपेक्षित दिल्ली दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. या भेटीबाबत आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मागील आठवड्यात उद्धव व राज ठाकरे यांचा वरळीत मराठीच्या मुद्द्यावर विजयी मेळावा झाला. त्यामध्ये उद्धव यांनी राजकीय युतीचे संकेत दिले. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या महापालिका निवडणुकीवरील परिणामांबाबत चर्चा केली असल्याचे समजते आहे.
दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी अनेक वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते अमित शाह यांचीही एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी गुप्त राजकीय खलबते झाली होती. यावेळी अमित शाह यांनी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा नेमका प्रभाव कितपत आहे, याविषयी माहिती एकनाथ शिंदेंकडून जाणून घेतल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
महापालिका निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या पर्यायापासून अन्य विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. भाजपचे लक्ष्य आता मुंबई महापालिका असून ठाकरे बंधू निवडणुकीत एकत्र आले तर त्याचे कसे परिणाम होतील, याबाबत भाजपच्या दिल्लीतील नेत्यांमध्ये चिंता आहे. त्यातच गेल्या दोन ते तीन दिवसांत भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे डिवचणारी विधाने केली आहे. ठाकरे यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतली तर काय परिणाम होतील? याबाबत ही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे कळते आहे.
भाजपने युतीच्या प्रभावाचा अंदाज घेण्यासाठी काही खासगी संस्थांकडून सर्वेक्षण करून घेतले असून, त्याचे निष्कर्ष शाह यांनी शिंदे यांना दिले. या युतीचा मुकाबला करण्यासाठी इतर कोणते पक्ष वा नेते सोबत घेता येतील, याचाही आढावा बैठकीत घेण्यात आला असल्याचे समजते आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये महायुतीमधील अंतर्गत वादाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याबाबतही दिल्लीत अमित शाह आणि शिंदेंच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. शिंदे गटाच्या काही आमदारांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे गदारोळ झाला होता. याबाबत भाजपने दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती. त्यामुळे अमित शाह यांनी, महापालिका निवडणुकीपर्यंत हे प्रकार घडणार नाही, याची काळजी घ्या. महायुती एकसंध आहे, हा संदेश लोकांपर्यंत गेला पाहिजे, अशी सूचना एकनाथ शिंदे यांना केल्याचे समजते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




