मुंबई l Mumbai (प्रतिनिधी)
वीज खांबापासून ३० मीटरच्या आत असलेल्या सर्व अनधिकृत कृषिपंप वीज जोडण्यांना येत्या २६ जानेवारीपूर्वी अधिकृतपणे जोडण्या देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी गुरुवारी दिली.
राज्यात जवळपास ४लाख ८६ हजार अनधिकृत कृषिपंप वीज जोडण्या असून यापैकी किमान ३० टक्के अनधिकृत जोडण्या या वीज खांबापासून ३० मीटरच्या आत आहेत. याशिवाय येत्या ३१ मार्चपर्यंत राज्यातील सर्वच अनधिकृत कृषीपंप वीज जोडण्यांना अधिकृत करण्याचा निर्णय झाल्याचे राऊत यांनी सांगितले.
नितीन राऊत यांनी आज म महावितरणच्या सर्व उच्चपदस्थ अधिका-यांची बैठक घेतली. बैठकीत राज्य मंत्रीमंडळाने अलिकडेच मंजूर केलेल्या कृषी पंप धोरणाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. या बैठकीला उर्जा विभागाचे प्रधान सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
या निर्णयामुळे कित्येक वर्षे महावितरणच्या कार्यालयात कृषिपंप वीज जोडणीसाठी चकरा मारणाऱ्या शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.
कृषी पंप वीज धोरणानुसार दरवर्षी एक लाख कृषिपंपाना वीज जोडण्या देण्यात येणार असून या पंपांना योग्य दाबाचा पुरवठा मिळावा म्हणून पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी दरवर्षी दीड हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.