औरंगाबाद – Aurangabad
कोरोनाची (corona) दुसरी लाट ओसरली असून सध्यस्थितीत केवळ 27 सक्रीय रुग्ण शहरात आहेत. रुग्ण घटल्यामुळे महापालिकेने कोविड केअर सेंटर (Covid Care Center) बंद केले आहे. त्यामुळे आता या सेंटरमध्ये नियुक्त सुमारे दीडशे कर्मचार्यांना पालिकेने मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीच्या कामाला लावले आहे. कर वसुलीचे प्रमाण वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने प्रत्येकास उपचार देण्यासाठी पालिकेने 22 कोविड केअर सेंटर शहरात सुरू केले होते. मात्र आता मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्याचे दिसत आहे. त्यामुळे पालिकेने सर्व कोविड केअर सेंटर बंद केले आहेत. केवळ मेल्ट्रॉन येथील कोविड सेंटर सध्या सुरु आहे. भविष्यात तिसरी लाट आलीच तर बंद केलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु केले जाणार आहे.
मात्र सध्यस्थितीत या सर्व कोविड केअर सेंटरवर नियुक्त कर्मचारी रिकामेच बसून होते. त्यांच्याकडे अन्य कोणतेही काम देण्यात आले नव्हते. त्यामुळे या सर्व कर्मचार्यांना माघारी बोलावण्याचे आदेश आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी जारी केले. या कर्मचार्यांची संख्या दीडशेच्या घरात असून येत्या आठ दिवसात ते आपापल्या विभागात रुजू होतील. त्यानंतर त्यांना कर वसुलीच्या कामावर पाठवले जाणार आहे. नऊ प्रभाग कार्यालयात त्यांची विभागणी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून पालिकेची मालमत्ता व पाणीपट्टी कराची वसुली ढेपाळली आहे. त्यामुळे कर वसुलीचे प्रमाण वाढवणे आवशयक आहे. परिणामी, कर वसुलीचे प्रमाण वाढवण्याच्या उद्देशाने कोविड केअर सेंटरमधील नियुक्त कर्मचार्यांना परत बोलावून कर वसुलीच्या कामावर पाठवले जाणार आहे.