पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpri Nirmal
राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ परीसरात गेल्या मार्च, एप्रिल महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी व गारपीटीमुळे शेतकर्यांच्या रब्बी पिके व फळबागांचे अतोनात नुकसान झाले होते. यासाठी राज्य सरकारने जिल्ह्यासाठी जवळपास 47 कोटी रुपयांची मदतही दिली आहे. मात्र लाभधारक शेतकर्यांनी ई-केवायसी करून दोन महिने उलटून गेले तरीही संबंधित शेतकर्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले नाही. त्यामुळे शेतकर्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून प्रशासनाने तातडीने लाभधारक शेतकर्यांच्या नावे संबंधित अनुदान जमा करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
गेल्या मार्च व एप्रिल महिन्यामध्ये प्रचंड वारा व गारपिटीमुळे पिंपरी निर्मळ परिसरात अनेक शेतकर्यांच्या रब्बी व फळबाग पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. राज्य सरकारने शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी दोन टप्प्यात अनुदान जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केले आहे. त्यामध्ये प्रथम 25 कोटी 20 लाख त्यांनंतर 21 कोटी 30 लाख अशा रकमा दोन टप्प्यात मिळाल्या आहेत. या रकमा मिळाल्यानंतर महसूल प्रशासनाने संबंधित शेतकर्यांना ई केवायसी करण्यासाठी सूचना केल्या होत्या. ई केवासी करून जवळपास दोन महिने उलटून गेले आहेत.
मात्र अद्याप या रकमा जिल्हा प्रशासनाने संबंधित शेतकर्यांच्या खात्यावर जमा केलेल्या नाहीत. सध्या खरीप पेरणीचा हंगाम सुरू आहे. खते बियाणे मशागत यासाठी शेतकर्यांना पैशाची निवड असते. मात्र वेळेवर हक्काचे पैसे न मिळाल्याने शेतकर्यांना उसनवारी करण्याची वेळ आली आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने या रकमा संबंधित शेतकर्यांच्या खात्यावर जमा कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.




