मुंबई । Mumbai
जागतिक स्तरावर वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि कच्च्या तेलाच्या किमतीत होणाऱ्या वाढीमुळे देशांतर्गत बाजारपेठेत चिंतेचे वातावरण आहे. अशातच अमेरिकेने रशियाच्या समुद्रात अडकलेल्या तेलवाहू जहाजांमधून भारताला तेल घेण्यास ३० दिवसांची तात्पुरती मुभा दिली आहे. मात्र, अमेरिकेच्या या निर्णयावरून आता देशांतर्गत राजकारण चांगलेच तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कर्नाटक येथील कलबुर्गी येथील जाहीर सभेत केंद्र सरकारवर सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘गुलाम’ झाले आहेत, असा खळबळजनक आरोप खर्गे यांनी केला. “मोदी सरकारने भारताचे सार्वभौमत्व आणि परराष्ट्र धोरण वॉशिंग्टनकडे गहाण ठेवले आहे,” असेही ते म्हणाले. भारताने कोणाकडून तेल खरेदी करावे हे ठरवणारी अमेरिका कोण? असा सवाल करत त्यांनी मोदींच्या मौनावर बोट ठेवले. ट्रम्प यांनी दिलेली ३० दिवसांची मुदत ही भारतासाठी अपमानास्पद असल्याचे खर्गे यांनी नमूद केले.
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या या टीकेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस म्हणाले की, “ज्यांचे संपूर्ण आयुष्य केवळ एका कुटुंबाच्या गुलामगिरीत गेले, त्यांना देश कसा चालवला जातो आणि देशाचे सार्वभौमत्व कसे जपले जाते, याची पुसटशीही कल्पना नाही.” पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या निर्णयांमुळेच आज भारताची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित झाली आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला.
फडणवीस यांनी पुढे सांगितले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा ‘टॅरिफ वॉर’ची परिस्थिती निर्माण झाली होती, तेव्हा भारत कोणापुढेही झुकला नाही. उलट भारताने कणखर भूमिका घेत विविध देशांशी स्वतंत्र टॅरिफ करार केले, ज्यामुळे प्रतिस्पर्धी देशांना मागे हटावे लागले. अशा परिस्थितीत एका कुटुंबाची चाकरी करणाऱ्यांनी मोदींवर टीका करणे हास्यास्पद असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.





