अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
बुरूडगाव रस्ता परिसरातील समर्थनगर येथे घरासमोर साचलेली माती हटविण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका शेतकर्यावर खोर्याने हल्ला करून मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी (12 जुलै) सायंकाळी घडली. या प्रकरणी चार जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबासाहेब किशोर राऊत (वय 40, रा. समर्थनगर, बुरूडगाव रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर सुनील राऊत, राजेश संजय राऊत, अमोल संजय राऊत, सुनील गुलाब राऊत (रा. बुरूडगाव रस्ता) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या घरासमोर ठेवलेली माती जेसीबीच्या साहाय्याने ढकलून समोरील नारळाच्या झाडावर पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ते झाडावर पडलेली माती बाजूला करण्यासाठी गेले असता, तेथे वाद निर्माण झाला. फिर्यादीनुसार, सागर राऊत याने त्यांच्या हातातील खोरे हिसकावून घेत मारहाण केली. तसेच इतर तिघांनीही मारहाण केली. हातपाय तोडण्याची, कार्यक्रम करतो अशी धमकी देत शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.




