अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मार्च- 2026 या कालावधीत विविध जिल्ह्यांत अवकाळी पाऊस यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकर्यांना मदत देण्याकरिता शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार रुपये 164,83,44,000/- (रूपये एकशे चौसष्ट कोटी त्र्याऐंशी लक्ष चवेचाळीस हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात आली आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्यातील 27602 बाधित शेतकर्यांना 25 कोटी 20 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे बाधित शेतकर्यांना खरीपाच्या तोंडावर दिलासा मिळाला आहे.
डीबीटी पोर्टलव्दारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरीत करण्यात येणार आहे. चालू हंगामामध्ये यापूर्वी शेतीपिकांच्या नुकसानीकरिता वितरीत करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तांवातर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही. दरम्यान, मार्च 2026 मध्ये राहुरी, नेवासा, राहाता, अकोले, नगर व पाथर्डी या सहा तालुक्यात वादळी वार्यासह अवकाळी पाऊस झाला होता. त्यावेळी पारनेर, राहुरी, नेवासा या तालुक्यात गारपीट झाली होती. पुन्हा नगर, राहुरी, पारनेर, श्रीरामपूर, नेवासा या तालुक्यात गारपीट झाली.
या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते, अंगणे व शेतांमध्ये गारांचा सडा पडला. द्राक्ष, आंबा, डाळींब, टरबूज या फळपिकांसह गहू, हरभरा आणि चारा यांसारख्या पिकांना मोठा फटका बसला. यावेळी वादळी वार्यामुळे पिके आडवी झाली. अनेक ठिकाणी काढणीला आलेले गहू पीक जमीनदोस्त झाले. कापून ठेवलेला गहू भिजल्याने नुकसान वाढले असून चार पिक असणारी मका आडवी झाली होती. त्यामुळे शेतकर्यांचा आर्थिक कंबरडेच मोडले गेले होते. या नुकसानीपोटी सरकारने आता भरपाई जाहीर केली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.





