येवला | प्रतिनिधी Yeola
केंद्र आणि राज्य सरकारसह भाजपला लक्ष्य करत केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात-निर्यात धोरणांचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याची जोरदार टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
येवला दौऱ्यावर आलेले सपकाळ पत्रकारांशी बोलत होते. चुकीच्या धोरणांमुळे कांदा, सोयाबीन, कापूस, आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तर राज्यात कोणतीही टंचाई नाही, असे फडणवीस सांगत असताना प्रत्यक्षात सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी डिझेल अभावी अडचणीत आला आहे. सरकारने अफवा न पसरवता योग्य नियोजन करून कष्टकरी आणि शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणीही सपकाळ यांनी यावेळी केली.
बांगलादेशातील एका रिफायनरीला भारतातून मोठ्या प्रमाणात डिझेल पुरवठा होत असल्याचा दावा करत सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी लक्ष्य केले. पूर्वी काँग्रेसने केलेले आरोप फेटाळण्यात आले होते, मात्र आता तेच आरोप खरे ठरत असल्याचे दिसत आहे, असेही ते म्हणाले.
सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाने काही ठिकाणी मनी लॉन्ड्रिंगचे व्यवहार सुरू होते. अंधश्रद्धेचा प्रचार करून भाजपला पोषक वातावरण निर्माण करण्यात आले. लगतच्या जिल्ह्यात “जामतारा”सारखी आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर चालवली जात असल्याचा आरोपही सपकाळ यांनी अशोक खरात प्रश्नावर बोलताना केला. याप्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार डॉ शोभा बच्छाव, नाशिक शहराध्यक्ष निलेश खैरे, राजाराम पानगव्हाणे, युवक जिल्हाध्यक्ष गौरव पानगव्हाणे, अॅड. समीर देशमुख आदी उपस्थित होते.




