लोणी |वार्ताहर| Loni
आधीच अडचणीत असलेल्या बळीराजाला आता आणखी मोठा धक्का बसला आहे. खतांच्या किमतीत 200 ते 600 रुपयांपर्यंत प्रचंड वाढ झाल्याने खरीप हंगाम अडचणीत येण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरात खत उत्पादन करणार्या विविध कंपन्यांनी थोड्याफार प्रमाणात दरवाढ केली होती. मात्र बळीराजाने ते आर्थिक भार सहन केला. आता मात्र खरीप हंगामाच्या तोंडावर खत उत्पादक कंपन्यांनी विविध खतांच्या किमतीत मोठी वाढ केल्याने बळीराजाचे आर्थिक गणित कोलमडलणार आहे. गेल्या महिनाभरापासून जमिनीची मशागत करून पावसाची वाट पाहणार्या बळीराजाला दोन दिवसांपासून दिलासा मिळाला असला तरी खतांच्या दरवाढीने त्याच्यापुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
डीएपी या खताची दरवाढ झाली नसली तरी ते बहुतांश ठिकाणी उपलब्धच नाही. इतर खतांचे वाढलेले दर पुढील प्रमाणे.कंसात जुने दर 10.26.26- 2250 (1720), 12.32.16- 2250 (1720), 15.15.15- 2025 (1650), 20.20.0.13- 2150 (1500), 9.24.24- 2400 (2100), 8.21.21- 2300 (1975), 24.24.0- 2500 (1900), पोटॅश- 2000 (1535), अमोनिअम सल्फेट – 1400 (950). शेतकरी कर्जबाजारी झाला असून तो राज्य सरकारच्या कर्जमाफीची वाट बघत आहे. निसर्गाची त्याला साथ मिळत नाही. शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नाही. शेती पंपाच्या वीज पुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला आहे.
शेती कामासाठी मजूर मिळत नाही. शेती करणार्या मुलांचे विवाह ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. अनेक अडचणींचा सामना करीत तो स्वतः जगण्याबरोबरच इतरांचे पोट भरावे म्हणून अहोरात्र कष्ट करीत आहे. त्याला मदतीची गरज असताना त्याच्यावर आर्थिक बोजा टाकला जात असल्याने तो मेटाकुटीला आला आहे. खत उत्पादक कंपन्यांनी नवीन दरवाढ मागे घ्यावी यासाठी सरकारने तातडीने त्यांना आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.




