पिंपरी निर्मळ |वार्ताहर|Pimpri Nirmal
2026 च्या खरिप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. खत कंपन्यांनी प्रति गोणी 200 ते 300 रुपयांपर्यंत दरवाढ केली असून कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने आणि जागतिक तणावामुळे खतांच्या किमती वाढल्याची चर्चा आहे. एकीकडे एल निनोमुळे सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज तर दुसरीकडे रासायनिक खतांच्या किंमतीत वाढ असा दुहेरी फटका शेतकरी वर्गाला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शेतकर्यांना शेती पिकवण्यासाठी रासायनिक खतांची गरज पडते. मात्र या खतांमध्ये होणार्या दरवाढीचा फटका शेतकर्यांना कायमच बसत असतो. 2026 चा खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना रासायनिक खतांच्या दरवाढीचा भडका उडाल्याचे चित्र आहे.
यामध्ये 50 किलोच्या खताच्या प्रति बॅग मागे जवळपास शंभर ते तीनशे रुपयांची वाढ झाल्याचे चित्र आहे. सध्या 1 हजार 500 ला मिळणारे 20ः20ः0 या गोणीची किंमत 300 ने वाढून 1 हजार 800 तर 14:35:14 ची किंमत 200 ने वाढून 2 हजार 350 झाली आहे. 15:15:15 मध्ये प्रती गोणी तिनशेची वाढ तसेच 24:24:08, 8:21:21, एमओपी यामध्ये प्रति बॅग शंभर ते दोनशे पर्यंत वाढ झाली आहे. सध्या युरियाचे दर स्थिर असून पुढील महिन्यात त्यामध्येही वाढ होण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे.
हवामान विभागाने यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याचा अंदाज व्यक्त केल्यामुळे शेतकर्यामध्ये आधीच भीतीचे वातावरण निर्माण झालेले असताना रासायनिक खताच्या दरवाढीचे शेतकरी वर्गासमोर दुहेरी संकट निर्माण झाले आहे. या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर सरकारने हस्तक्षेप करून होऊ घातलेली ही रासायनिक खतांची भाववाढ रोखावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने बनावट खते निर्माते व विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात फावणार आहे. बनावट खतांमुळे शेतकर्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. राजकीय दबाव किंवा आर्थिक तडजोडीला न जुमानता कृषी विभागाला अशा बनावट खते व औषधे विक्रेत्यांविरोधात कडक धोरण अवलंबवावे लागणार आहे.





