राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
आज 23 एप्रिल रोजी होणार्या राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून यावेळी एकूण 3 लाख 33 हजार 545 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांना सुरक्षित व निर्भयपणे मतदान करता यावे यासाठी सर्व 374 मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीतील एक अत्यंत महत्त्वाचा व नाविन्यपूर्ण बदल म्हणजे, मतदान कर्मचार्यांना ईव्हीएम व साहित्यासाठी मुख्यालयात एकत्र येण्याची गरज नसून, त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवरच थेट साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य पुन्हा केंद्रावरूनच क्षेत्रीय अधिकार्यांकडे जमा करावयाचे आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके यांच्या मार्गदर्शनाखाली व निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांच्या देखरेखीखाली या निवडणूक प्रक्रियेचे अत्यंत सूत्रबद्ध नियोजन करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत 36 पोलीस अधिकारी, 708 पोलीस कर्मचारी आणि 391 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची एक तुकडी आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक प्लाटून सुरक्षेसाठी पाचारण करण्यात आली आहे.
संपूर्ण मतदान प्रक्रियेत पारदर्शकता राहावी यासाठी सर्व 374 मतदान केंद्रांवर ‘वेबकास्टिंग’ द्वारे थेट लक्ष ठेवले जाणार आहे. मतदार ओळखपत्र नसलेल्या नागरिकांनाही आपला हक्क बजावता यावा, यासाठी भारत निवडणूक आयोगाने 12 पर्यायी कागदपत्रांना मान्यता दिली आहे. यामध्ये आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, बँक किंवा पोस्ट ऑफिसचे छायाचित्रयुक्त पासबुक आदींचा समावेश असून यापैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार आहे. मतदारसंघातील 1 लाख 72 हजार 231 पुरुष, तसेच 1 लाख 61 हजार 312 स्त्री आणि इतर 2 मतदारांनी 23 एप्रिल रोजी लोकशाहीच्या या उत्सवात हिरीरीने सहभाग नोंदवून जास्तीत जास्त मतदान करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांनी केले आहे.





