राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राज्यातील सनदी अधिकारी व अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धाडसी कार्यशैलीचा महाराष्ट्र सध्या अनुभव घेत असतांनाच अहिल्यानगर जिल्ह्यातील एका तरुण आयपीएस पोलीस अधिकार्याने तेलंगणा राज्यात त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या अन्न भेसळ विरोधी विशेष पथकाने आतापर्यंत 208 गुन्हे दाखल करीत तब्बल 292 टन भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.
जिल्ह्यातील पिंपळगाव माळवीचे मूळ रहिवासी असलेले वैभव रघुनाथ गायकवाड हे 2018 बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. त्यांची तेलंगणा कॅडरमध्ये नियुक्ती झाल्यानंतर नालगोंडा, वरंगळ, पेद्दापल्ली आणि नागरकर्नल येथे पोलीस अधीक्षक व विविध जबाबदार्या सांभाळल्यानंतर, डिसेंबर 2025 पासून ते हैदराबाद टास्क फोर्सची जबाबदारी सांभाळत आहेत. गायकवाड यांची हैदराबाद टास्क फोर्सचे उपायुक्त म्हणून अन्नभेसळ, ड्रग्ज रॅकेट आणि संघटित गुन्हेगारी विरोधात आरपारची लढाई छेडली आहे. संघटित गुन्हेगारी, राऊडीशीटर्स आणि सण-उत्सवातील बंदोबस्ता सोबतच त्यांच्याकडे हैदराबाद सिटी नार्कोटिक्स विंग आणि मार्च 2026 मध्ये स्थापन झालेल्या अन्नभेसळ विरोधी विशेष पथक या अत्यंत महत्त्वाच्या विभागांची सूत्रे आहेत.
नागरिकांच्या जीवाशी खेळणार्या अन्नभेसळ माफियांच्या मुळावर घाला घालत विशेष पथकाने आतापर्यंत 208 गुन्हे दाखल करीत तब्बल 292 टन भेसळयुक्त अन्नपदार्थ यात मसाले, तूप, बनावट रंग वापरलेले पदार्थ, जप्त केले आहेत. दुसरीकडे नार्कोटिक्स विंग मार्फत गेल्या 8 महिन्यांत 400 हून अधिक गुन्हे दाखल करून 25 कोटींहून अधिक किमंतीचे मादक पदार्थ जप्त केले आहेत. स्पीड पोस्टद्वारे 22 राज्यांत गांजा पुरवणार्या नेटवर्कचा पर्दाफाश करत बेकायदेशीर राहणार्या 35 परदेशी नागरिकांना देशाबाहेर हद्दपार केले. विशेष म्हणजे, केवळ कारवाईवर न थांबता सुमारे 800 व्यसनाधीन व्यक्तींना उपचारासाठी पुनर्वसन केंद्रात पाठवून सप्लाय आणि डिमांड या दोन्ही बाजू एकाच वेळी मोडून काढण्याचे धोरण त्यांनी राबवले आहे. श्री. गायकवाड हे राहाता तालुक्यातील पिंपळस येथील ज्ञानेश्वर लोखंडे यांचे भाचे आहेत. तर भारत लोखंडे व संदीप लोखंडे यांचे आतेभाऊ आहेत.
अन्न भेसळ विरोधात पोलीस यंत्रणेचा अशा प्रकारे थेट सहभाग घेऊन स्वतंत्र पथकाच्या माध्यमातून काम करण्याचा हा एक अभिनव प्रयोग आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश अन्न भेसळीचे स्रोत व संपूर्ण शोधणे, भेसळ करणार्यांवर कठोर कारवाई करणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे हा आहे. अन्नभेसळीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या आरोग्याशी होणारा खेळ आणि ड्रग्जमुळे उद्ध्वस्त होणारी तरुण पिढी वाचवणे हेच आमचे अंतिम ध्येय आहे. गुन्हेगारांवर कठोर प्रहार करतानाच भरटकलेल्या तरुणांना पुनर्वसनातून पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
– वैभव गायकवाड, उपायुक्त, टास्क फोर्स




