नवी दिल्ली | New Delhi
झारखंड मुक्ती मोर्चाचे (JMM) संस्थापक आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन (Shibu Soren) यांचे आज (सोमवारी) सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले आहे.दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना किडनीशी संबंधित समस्या होती. त्याशिवाय प्रकृतीच्या आणखी देखील समस्या होत्या. ते ८१ वर्षांचे होते.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करत त्यांच्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, आदरणीय दिशोम गुरुजी आपल्या सर्वांना सोडून गेलेत. आज मी शुन्य झालोय, असे हेमंत सोरेन म्हणाले आहेत. शिबू सोरेन यांना २४ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज (सोमवारी) त्यांचे निधन झाले.
शिबू सोरेन यांचा जन्म ११ जानेवारी १९४४ रोजी सध्याच्या रामगड जिल्ह्यातील (Raigad District) गोल ब्लॉकमधील नेमरा येथे झाला. गावातील शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या दिशाम गुरु यांचे आयुष्य संघर्षांनी भरलेले आहे. ते फक्त १३ वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांची सावकारांनी हत्या केली. त्यानंतर शिबू सोरेन यांनी त्यांचे शिक्षण सोडून सावकारांविरूद्ध लढण्याचा निर्णय घेतला.
शिबू सोरेन यांची राजकीय कारकीर्द
शिबू सोरेन हे ०२ मार्च २००५ रोजी झारखंडचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, परंतु बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे त्यांना दहा दिवसांत राजीनामा द्यावा लागला. यानंतर २७ ऑगस्ट २००८ रोजी शिबू सोरेन दुसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री झाले. यावेळी ते आमदार नव्हते. या कारणास्तव, त्यांना निवडणूक जिंकून सहा महिन्यांत विधानसभेचे सदस्य व्हावे लागले. त्यानंतर पाच महिन्यांनी २००९ मध्ये पोटनिवडणूक झाली. मात्र या निवडणुकीत त्यांचा ९ हजार मतांनी पराभव झाला. तामार मतदारसंघातून त्यांनी विधानसभेची ही निवडणूक लढवली होती. त्यामुळे १८ जानेवारी २००९ रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
त्यानंतर शिबू सोरेन ३० डिसेंबर २००९ रोजी तिसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री झाले. यावेळी पुन्हा त्यांना फक्त पाच महिन्यांसाठी मुख्यमंत्रिपदावर बसण्याची संधी मिळाली. यानंतर त्यांनी ३१ मे २०१० रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. याशिवाय शिबू यांनी १९८० साली लोकसभेची निवडणूक जिंकली. दुमका येथून ते पहिल्यांदा खासदार बनले. त्यानंतर १९८६, १९८९, १९९१ आणि १९९६ ते सलग जिंकत राहिले. मात्र, १९९८ च्या निवडणुकीत भाजपचे तत्कालीन प्रदेश अध्यक्ष बाबूलाल मरांडी यांनी त्यांचा पराभव केला. तर १९९९ च्या निवडणुकीत त्यांनी पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवले. पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर २००४, २००९ आणि २०१४ मध्ये ते दुमकामधूनच विजयी झाले. एकूण ८ वेळा ते लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले. त्यांनी केंद्रात नरसिंह राव आणि मनमोहन सिंग सरकारमध्ये मंत्रीपद भूषविले होते.





