मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena UBT) पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या चर्चेत असलेले माजी आमदार राजन साळवी (Former MLA Rajan Salvi) यांनी अखेर ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. साळवींनी ठाकरेंच्या पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा (Resignation) दिला असून ते उद्या दुपारी तीन वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे कोकणात ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात (Ratnagiri District) राजन साळवी यांनी अनेक वर्षे आमदार म्हणून शिवसेनेचे प्रतिनिधित्व केले आहे. कोकणातील लांजा, राजापूर आणि साखरपा परिसरात राजन साळवी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. राजन साळवी हे मातोश्रीचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते. परंतु, अलीकडच्या काळात विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्याशी झालेल्या वादात उद्धव ठाकरे यांनी राऊतांची बाजू उचलून धरल्यामुळे ते नाराज झाले होते. तसेच उद्धव ठाकरे यांनी ‘तुम्हाला दुसऱ्या पक्षात जायचे असेल, तर दरवाजे उघडे आहेत’, असा संदेश दिला होता. त्यामुळे राजन साळवी प्रचंड दुखावले गेले होते.
दरम्यान, यानंतर आता राजन साळवी यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राजन साळवी यांचा पराभव झाला होता. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांचे बंधू किरण सामंत यांनी साळवी यांचा राजापूर मतदारसंघातून पराभव केला होता. त्यानंतर आता साळवी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या जाण्याने ठाकरे गटाला (Thackeray Group) कोकणात मोठा फटका बसणार आहे.