अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना वर्षातून एकदा मोफत साडी देण्याचा उपक्रम पुन्हा सुरू होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून विविध निवडणुकांमुळे ठप्प पडलेले साडी वाटप आता मे महिन्यात पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, जिल्ह्यातील 86 हजार 978 कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे.

जानेवारी 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिला लाभार्थ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. राज्य यंत्रमाग महामंडळामार्फत लाल, हिरवा, पिवळा व निळ्या रंगांच्या साड्यांचा पुरवठा करण्यात आला होता. मार्च 2023 पासून स्वस्त धान्य दुकानांमधून या साड्यांचे वितरणही सुरू झाले होते. जिल्ह्यातील 1 हजार 887 स्वस्त धान्य दुकानांव्दारे एकूण 83 हजार 47 साड्यांचे वाटप करण्यात आले होते, जे सुमारे 94.33 टक्के होते. मात्र, काही लाभार्थी स्थलांतरित होणे किंवा परगावी असणे यांसारख्या कारणांमुळे सुमारे 4 हजार 990 साड्या वितरित होऊ शकल्या नव्हत्या.
यानंतर लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे ही योजना थांबली होती. आता रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा साडी वाटप सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा साडीबरोबरच लाभार्थ्यांना कापडी पिशवीही देण्यात येणार असून, साड्यांचे वितरण रेशन दुकानांमधून धान्याप्रमाणेच ई-पॉस मशीनच्या माध्यमातून केले जाणार आहे. मे महिन्यातील नियमित धान्य वाटपासोबतच साडी वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.




