राहाता (तालुका प्रतिनिधी)
गोदावरी कालव्यांना जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात रब्बीचे पहिले आवर्तन सुटण्याची शक्यता आहे. गोदावरीच्या दोन्ही कालव्यावर रब्बी हंगामासाठी २३ डिसेंबरला ७ क्रमांकाच्या अर्जासाठी जलसंपदा विभागाने प्रगटन प्रसिद्ध केले होते. ६ जानेवारीपर्यंत सात क्रमांकाचे अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे.
कालपर्यंत उजव्या कालव्यावर अवघी १३० हेक्टर क्षेत्राला मागणी आली. अजून चार दिवसात किती मागणी येईल हे ६ तारखेला कळेल. कोपरगावच्या दिशेने वाहणाऱ्या डाव्या कालव्यावर यापेक्षा वेगळी स्थिती नाही. खरं तर रब्बीचे पहिले आवर्तन नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अथवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुटते. परंतु यंदा पाऊस उशिरापर्यंत सुरू होता.
त्यातच अनेक ठिकाणी शेतात पाणी साठून होते. त्यामुळे त्या शेतांना वापसा नव्हता. जे क्षेत्र लवकर वापश्यावर आले, तेथे शेतकऱ्यांनी रब्बीचे पिके, गव्हाच्या पेरण्या केल्या. उसाच्या पिकांच्या लागवडी केल्या. इंधन विहिरींना तसेच विहिरींना पाणी असल्याने त्याचे पाणी या पिकांना दिले गेले. आता उन्हाचा चटका आणि काही ठिकाणी कालव्याच्या पाण्याची गरज म्हणून काही शेतकरी रब्बीच्या पहिल्या आवर्तनाची मागणी करत आहेत.
यंदा धरणे तुडुंब भरलेली आहेत. पिण्याच्या पाण्यासह २ रब्बी व २ उन्हाळी होऊ शकली असती. परंतु आता कालावधी पाहता रब्बीचे एक व उन्हाळी २ आवर्तनं होऊ शकतील असा अंदाज आहे. पुढील आठवड्यात आवर्तन सुटल्यानंतर हे आवर्तन महिनाभर सुरू राहील. सुरुवातीला पिण्यासाठी आणि त्याला जोडून सिंचनाचे आवर्तन होऊ शकेल. लाभधारक शेतकऱ्यांनी पाणी मागणी कमी केली तर आवर्तन कालावधी घटू शकणार आहे.
वास्तविक उजव्या कालव्यावर ३००० ते ३५०० हेक्टर पर्यंत मागणी, डाव्या कालव्यावर २००० हेक्टर पर्यंत मागणी केली जात असे. त्यामुळे आवर्तन कालावधी महिनाभर अथवा त्याहून अधिक काळ असायचा. ६ जानेवारी पर्यंत किती पाणी मागणीचे अर्ज दाखल होतात. किती क्षेत्राची मागणी होते हे पाहणे महत्वाचे ठरेल. रब्बीचे पहिले आवर्तन पुढील आठवड्यात सुटणार आहे. राज्याचे जसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाने हे आवर्तन पुढील आठवड्यात सुटेल असा अंदाज आहे.




