Sunday, June 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी गोदावरी प्रदूषणमुक्त करावी : संजयदास महाराज

सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी गोदावरी प्रदूषणमुक्त करावी : संजयदास महाराज

गोदावरी घाट परिसराची पाहणी; प्रशासनाला विविध सूचना

- Advertisement -

पंचवटी | प्रतिनिधी Panchavati

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेत गोदावरी नदी पूर्णपणे प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी संजयदास महाराज यांनी केली. कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून लाखो भाविक नाशिकमध्ये येणार असल्याने गोदावरी नदीचे पावित्र्य, स्वच्छता आणि धार्मिक महत्त्व अबाधित राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तपोवन साधूग्राम परिसरातील निर्मोही निर्वाणी आखाडा आणि दिगंबर आखाड्यासाठी प्रस्तावित जागांची पाहणी यावेळी करण्यात आली. ज्ञानदास महाराज यांचे शिष्य संजयदास महाराज, हेमंतदास महाराज आणि मुरलीदास महाराज यांनी रामकुंड परिसरास भेट देत घाट परिसर, धार्मिक स्थळे आणि विविध सुविधांची पाहणी केली. यावेळी प्रशासनाकडून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.बटुक हनुमान मंदिर परिसरालाही साधू-संतांनी भेट देत तेथील स्वच्छता, विकासकामे आणि संरक्षण व्यवस्थेबाबत सूचना केल्या. कुंभमेळ्यादरम्यान भाविकांना आवश्यक सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच धार्मिक परंपरा, संस्कृती आणि पवित्र स्थळांचे संवर्धन करण्यावर भर देण्यात आला.यावेळी शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच पुरोहित संघांचे अध्यक्ष सतीश शुक्ल आदी उपस्थित होते.

यावेळी महाराजांनी प्रशासनाकडे काही महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या. कुंभमेळ्याच्या काळात शहरातील मद्यविक्री व मांसाहार विक्रीची दुकाने बंद ठेवावीत, गोदावरी नदीत कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, तसेच रामकुंड परिसरातील आणि शहरातील पुरातन मंदिरांचे जतन व संवर्धन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.मंदिरांच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाला कोणतीही हानी पोहोचू नये यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरेचे प्रतीक असल्याचे सांगत प्रशासन, धार्मिक संस्था आणि नागरिकांनी एकत्रितपणे स्वच्छ, सुरक्षित आणि भव्य कुंभमेळ्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन साधू-संतांनी केले.

ताज्या बातम्या

शेत रस्त्याच्या वादातून तरुणास मारहाण

0
मानूर | वार्ताहर Manur कळवण तालुयातील भादवण शिवारात शेतजमिनीच्या वहिवाट रस्ता वादातून एका तरुणासह त्याच्या वडिलांना मारहाण केली. यामुळे मारहाण झालेल्या युवकाने विष घेत आत्महत्या...