Monday, April 27, 2026
HomeनगरAhilyanagar : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ

Ahilyanagar : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ

सरकारी कर्मचार्‍यांचा संप तिसर्‍या दिवशीही सुरू

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपावर असून, या संपाच्या तिसर्‍या दिवशी गुरूवारी (23 एप्रिल) अहिल्यानगर जिल्हा राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, मुख्याध्यापक व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘जागरण गोंधळ’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाव्दारे शासनाने तातडीने प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढावा, अन्यथा संप अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.

- Advertisement -

गुरूवारी सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालय परिसर संबळ, ढोलकीच्या गजराने दणाणून गेला होता. गोंधळी मंडळींनी पारंपरिक पध्दतीने जागरण करत आंदोलनाला वेगळा रंग दिला. गोंधळाला या… गोंधळाला या… अशा गीतांसह आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
या आंदोलनात समन्वय समितीचे निमंत्रक रावसाहेब निमसे, सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, विलास पेद्राम, वंदना नेटके, विजय काकडे, भागवत नवगण, अशोक मासाळ, शंकर जगताप, भाऊ शिंदे, वैशाली बोडखे, पुरूषोत्तम आडेप, विलास पेद्राम, संदिपान कासार, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब शिंदे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा. सुनील पंडित, माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सचिन झगडे, शिक्षकेतर संघटनेचे संदीप पानमळकर, महानगर माध्यमिक शिक्षक संघाचे शहराध्यक्ष उध्दव गुंड आदींसह मोठ्या संख्येने कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की, विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे वारंवार लक्ष वेधूनही त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे हा संप पुकारण्यात आला आहे. प्रमुख मागण्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणे, निवृत्तीचे वय 60 वर्षे करणे, रिक्त पदे तात्काळ भरणे अशा एकूण 18 मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत.

कामकाज ठप्प
या संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुतांश कामकाज ठप्प झाले असून, निवडणूक कामकाज वगळता इतर सर्व विभागांवर परिणाम झाला आहे. अनेक शाळांमधील शिक्षक संपात सहभागी झाल्यामुळे शैक्षणिक कामकाजावरही मोठा परिणाम जाणवत आहे. सरकारने तातडीने सकारात्मक भूमिका घेऊन मागण्यांवर निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा समन्वय समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Nashik TCS Case : निदा खानच्या अटकपुर्व जामिनाची सुनावणी ‘या’ तारखेला

0
नाशिकरोड |प्रतिनिधी| Nashik नाशिक येथील बहुचर्चित टीसीएस कंपनीत महिला सहकार्‍याच्या लैंगिक छळ आणि धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी या गुन्ह्यातील मुख्य संशयित निदा खान हिचा अटकपूर्व...