अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
ग्रामविकास विभागाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर पुढील सहा महिने विद्यमान सरपंच यांची नियुक्ती करण्याचे राजपत्र प्रसिध्द केले आहे. त्यानुसार झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे दि.01 जानेवारी, 2026 ते 28 फेब्रुवारी, 2026 या कालावधीत मुदत संपलेल्या किंवा संपणार्या ग्रामपंचायतीवर विद्यमान सरपंचच प्रशासक म्हणून यापुढेही काम पाहणार आहेत.
विद्यमान सरपंचानी राजीनामा दिला असल्यास, परागंदा असल्यास, अपात्र असल्यास, मयत असल्यास, इच्छुक नसल्याचे लेखी कळविले असल्यास किंवा कोणत्याही कारणाने सरपंचाचे पद रिक्त असल्यास अशा ग्रामपंचायतीची माहिती सोबतच्या प्रपत्र अ मध्ये तर ज्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व उपसरपंच दोन्ही पदे रिक्त आहेत अशा ग्रामपंचायतींची माहिती प्रपत्र व मध्ये तातडीने या कार्यालयाला सादर करण्याची दक्षता घ्यावी. नियुक्ती करून विद्यमान उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन करण्याबावत शासनाचे निर्देश आहेत, असल्याचे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
या आदेशाने नगर जिल्ह्यातील 1 हजार 327 ग्रामपंचायतींपैकी निम्म्याहून अधिक म्हणजे 757 ग्रामपंचायतींचा आता सरपंच हेच प्रशासक म्हणून कारभार पाहतील.
एकूण 757
अकोले 51, संगमनेर 94, श्रीरामपूर 27, कोपरगाव 29, राहाता 25, राहुरी 44, नेवासा 59, शेवगाव 48, पाथर्डी 77, जामखेड 49, श्रीगोंदे 56, कर्जत 54, पारनेर 87 व अहिल्यानगर 57 अशा या एकूण 757 ग्रामपंचायती आहेत.




