अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर शहरातून वाहणारे सीना नदीचे पात्र गटार आहे व अनेक अतिक्रमणे त्यात आहेत. सरकारी जागा दिसली की त्यात अतिक्रमण करायचे असा निर्णय येथे झालेला दिसतोय, असे जाहीर वाभाडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे काढले. वापरलेल्या 80 टक्के पाण्याचा पुनर्वापर होण्यासाठी ट्रीटमेंट प्लांट हवा. पुण्यात फक्त 18 टक्के पाण्याचा पुनर्वापर होतो. तसेच ग्रीनसिटी उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाची व्यापक चळवळ उभारा, अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली.
साईद्वारका सेवा ट्रस्ट आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त आयोजनाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेअंतर्गत एका वर्षात एक लाख वृक्षलागवडीच्या उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते शहरातील माऊली सभागृह येथे झाला. यावेळी आ. संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, यशवंत डांगे, अनिल मोहिते, दिलीप भालसिंग, नितीन दिनकर उपस्थित होते. नगर शहरात नियोजन नसलेला विकास झाल्याची स्थिती आहे. त्यामुळे शहराची रचना बदलण्याची गरज आहे. 14 किलोमीटर अंतराचे सीना नदी पात्र शहरातून जात आहे, पण त्याला गटारीचे स्वरूप आले आहे, अतिक्रमणे आहेत. त्यामुळे आता नदीच्या ब्ल्यू व रेड लाईनमध्ये लक्ष घालणार आहे. नदी स्वच्छ राहिली पाहिजे.
अतिक्रमणे काढली पाहिजे. शहराचे रूप बदलण्यासाठी महापालिकेने अहमदाबाद येथील संस्थेला सल्लागार नेमून पुढील दहा वर्षात नगर शहराची रचना कशी असावी याचे नियोजन करून घ्यावे, अशी सूचना नामदार विखे यांनी यावेळी केली. शहरे झपाट्याने विस्तारत असताना वाढते जल प्रदूषण नागरिकांच्या जीवनावर गंभीर परिणाम करत आहे. वैद्यकीय सर्वेक्षणांतूनही जल प्रदूषणामुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जलसंपदा विभागामार्फत धरण, नदी, नाले व अन्य परिसर मिळून सुमारे 56 हजार एकर जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली असून जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
स्व गणना करत जनगणनेचा शुभारंभ
राष्ट्रीय जनगणनेला महाराष्ट्रात सुरुवात झाली असून पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी स्व गणना करीत जनगणनेचा शुभारंभ केला. या जनगणनेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. पोलीस कवायत मैदान येथे 1 मे महाराष्ट दिनाच्या व कामगार दिनाच्या शासकीय ध्वजारोहण सोहळ्यानंतर स्वगणनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी टॅबवर स्वतःच्या घरगणनेसंबंधी असणार्या सर्व 34 प्रश्नांची उत्तरे भरली. स्वतःच्या घराची माहिती भरून सबमिट बटनावर क्लिक केल्यावर त्यांचा सेल्फ एन्युमरेशन आयडी तयार झाला. तत्पूर्वी सकाळी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम पार पडला.





