Tuesday, March 25, 2025
Homeनगरपाणीप्रश्न हाच आपला प्राधान्यक्रम राहील - ना. विखे पाटील

पाणीप्रश्न हाच आपला प्राधान्यक्रम राहील – ना. विखे पाटील

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांसाठी अधिकार्‍यांसमवेत आपण लवकरच बैठक घेणार असून, पाणीप्रश्न हाच आपला प्राधान्यक्रम आहे. नगरपालिका हद्दीतील प्रश्नांबाबतही मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून, निधीची उपलब्धता करून देण्याचे आश्वासन देतानाच अगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विचारात घेऊन महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी तालुक्यात आणि शहरात संघटना बांधणीचे काम सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या.

- Advertisement -

मांचीहिल येथे पालकमंत्री विखे पाटील आणि महायुतीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक ना.विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यामध्ये संगमनेर तालुक्यातील महत्त्वपूर्ण प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. भविष्यात तालुक्यात राबविण्यात येणार्‍या नव्या योजनांची आणि कामांची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली. मांचीहिल शैक्षणिक संकुलाचे प्रमुख शाळीग्राम होडगर, ज्येष्ठ नेते वसंत गुंजाळ, भाजपचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपील पवार, शिवसेनेचे रामभाऊ रहाणे, विठ्ठल घोरपडे, दिनेश फटांगरे, जावेद जहागिरदार, डॉ. अशोक इथापे, श्रीराज डेरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील मतदारांनी मोठ्या विश्वासाने परिवर्तन घडविले आहे. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीला मोठे यश आले. त्यामुळे निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून, या तालुक्यात नवे विकासाचे पर्व सुरू करण्यासाठी सामूहिकपणे आपल्याला काम करायचे आहे असे ना. विखे पाटील म्हणाले. पाणीप्रश्न गंभीर आहे. निळवंडे कालव्यांच्या माध्यमातून लाभक्षेत्रातील गावांना दिलासा मिळाला असला तरी लाभक्षेत्रातून वंचित राहिलेल्या गावांना पाणी कसे देता येईल याबाबतचा अभ्यास विभागाने सुरू केला असून, भोजापूर चारीचे पाणीही शेवटच्या गावाला मिळेल यादृष्टीने काम करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या समस्या सोडवून याबाबतचा एक अंतिम पर्याय शोधून त्यावर काम करावे लागणार असून निळवंडे धरणातून या योजनेलाही पाण्याची उपलब्धता करण्याबाबतही निर्णय करण्याचे सूतोवाच ना. विखे पाटील यांनी या बैठकीत केले.

साकूर आणि पठारभागातील गावांसाठी मुळा नदीतून पाणी देण्याबाबत उपसा सिंचन योजनेचा प्रयोग करावा लागणार आहे. यासाठी जलसंपदा विभागाकडून काम चालू झाले असून, लवकरच याला अंतिम स्वरुप कसे येईल हा माझा व्यक्तिगत प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही ना. विखे पाटील यांनी दिली. शहरातील प्रश्नांबाबत माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागिरदार यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत ना. विखे पाटील यांनी नगरपालिकेच्या अधिकार्‍यांसोबत बैठक घेवून या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. मागील युती सरकारच्या काळात तालुक्यासाठी आणि शहरासाठी मंजूर झालेला निधी तसेच निधी मंजूर होऊनही कामाला सुरुवात न झाल्याने याचा आढावा आता घ्यावा लागेल. यासाठी पुढील आठवड्यात तालुक्यात सर्व विभागांच्या अधिकार्‍यांसोबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मांचीहिल येथील कानिफनाथ देवस्थानला ‘क’ वर्ग देवस्थानाचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल ना. विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

संगमनेर तालुक्यातील अनेक तरुण मला यापूर्वी भेटले आहेत. औद्योगिक वसाहतीची त्यांची मागणी आहे. तळेगाव किंवा पठारभागात शासकीय जागा उपलब्ध होईल तेथे औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव आपण तयार करुन तो मार्गी लावण्यासाठी माझी केव्हाही तयारी असेल. पाणी प्रश्नाबरोबरच रोजगाराचाही प्रश्न सोडविण्यासाठी माझा प्रयत्न राहील, असे आश्वासन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...