मुंबई | Mumbai
सांगली जिल्ह्यातील (Sangali District) वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी (Tandulwadi) गावातील रहिवासी असलेल्या युवा कंत्राटदार हर्षल पाटील (Harshal Patil) यांनी दीड कोटींच्या थकित बिलासाठी आत्महत्येसारखं (Suicide) टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं आहे. या आत्महत्येनंतर विरोधकांकडून सरकारवर (Government) टीकेची झोड उठवली जात आहे.
काही दिवसांपूर्वी हर्षल पाटील यांनी राज्य सरकारच्या (State Government) जलजीवन मिशनअंतर्गत (Jaljeevan Mission) गावांमध्ये पाणी पोहोचवण्याचं काम पूर्ण केले. हे काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वत:च्या नावावर ६५ लाखांचं कर्ज काढलं होतं. यामुळे त्यांच्यावर कोट्यवधींचं कर्ज (Loan) झालं होतं.
एकीकडे कोट्यवधींचे कर्ज असताना दुसरीकडे सरकारकडून बिलं पास केली जात नव्हती. त्यांच्या कामाचा पैसा (Money) त्यांना मिळत नव्हता. त्यामुळे डोक्यावरील कर्ज फेडायचं कसं? या विवंचनेत हर्षल पाटील होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले?
हर्षल पाटील हा अभियंता असून, त्याच्या नावावर कुठलंच काम नाही. जलजीवन मिशन योजनेवर कुठलचं बिल थकीत नाही. एखाद्या वेळेस त्याने सबलेट काम घेतलं असावं, मात्र या बिलाची कुठेच नोंद नाही. जिल्हा परिषदेच्या सीईओंशी आमच्या कार्यालयाने संपर्क केलेला आहे. मी स्वतः कार्यकारी अभियंत्यांशी बोललो आहे. त्यामुळे मला तरी असे वाटते की, त्यांचा या गोष्टीत कुठलाही संबंध नाही. सबलेट काम केले असेल तर ते आम्हाला माहिती नाही, असे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी म्हटले.
कोण आहेत हर्षल पाटील?
हर्षल पाटील हा तरुण शासकीय कंत्राटदार होता. त्याने अगोदर कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur District) विविध शासकीय कामे केली. कोल्हापूरात चांगली कामे केल्याच्या जोरावर त्याला सांगली जिल्ह्यातही सरकारी कामे मिळाली. गावातीलच जलजीवन मिशनचे काम त्याने हाती घेतले. त्याच्या कामामुळे इतर गावातील नागरिकांनी, ग्रामपंचायतींनी त्याच्यामार्फत कामे करण्याचा प्रशासनाकडे हट्ट केल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. कोल्हापूर शहरातील कामं केल्यानंतर त्याने तांदुळवाडी येथील जलजीवनचे काम एका वर्षातच पूर्ण केले होते. इतर ठिकाणची कामं त्याला मिळाली. शासनाकडून थकीत बिल निघत नसतानाही त्याने उसनवारी करून काही ठिकाणची कामे मार्गी लावली. आपल्या नावाला बट्टा लागणार नाही, असे काम त्याने केले. पण साहित्य खरेदीसाठी त्याचा खर्च वाढला. आता बिलासाठी त्याच्यामागे तगादा लागला होता. थकीत बिलासाठी तो शासकीय कार्यालयात फेऱ्या मारत होता. थकीत बिल लवकर मिळावे यासाठी तो अधिकाऱ्यांना भेटला. पण त्याला यश मिळाले नाही. यामुळे तो तणावात आला आणि आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवलं असं त्याच्या गावकऱ्यांनी सांगितलं.




