नाशिक । प्रतिनिधी Nashik
शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेने शुक्रवारी (दि. ९) पुन्हा जोर धरला असून तब्बल पाच दिवसांनंतर कमाल तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला. हवामान विभागाच्या नोंदीनुसार शुक्रवारी नाशिकचे कमाल तापमान ४०.१ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
यापूर्वी ३ मे रोजी ३६.५ अंश, ४ मे रोजी ३६.२ अंश, ५ मे रोजी ३६.३ अंश, ६ मे रोजी ३७.५ अंश, ७ मे रोजी ३८.८ अंश तर ८ मे रोजी ३९.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. शुक्रवारी तापमानात आणखी वाढ होऊन पारा ४० अंशांच्या पुढे गेला.
दरम्यान, किमान तापमानही २३.४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने रात्रीदेखील उकाड्याची तीव्रता कायम असल्याचे नागरिकांनी सांगितले. सकाळी हवेतील आर्द्रता ३८ टक्के तर सायंकाळी २२ टक्के नोंदविण्यात आली.
दुपारच्या वेळेत रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कमी दिसून आली. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी दुपारी बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिण्याबरोबरच आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.




