येवला । प्रतिनिधी
तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात शनिवारी, (दि. २७) सायंकाळी पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या भागातील शेतातील पिके पुन्हा पाण्याखाली गेली आहेत.
उत्तर-पूर्व भागात सातत्याने कोसळणाऱ्या पावसाने आधीच शेतकरी हतबल झाला असताना अस्मानी संकट थांबायला तयार नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः आसू आले आहे. तालुक्यातील राजापूर, न्याहारखेडा, रेंडाळे, ममदापूर, अंगुलगाव, सायगाव, पांजरवाडी, भारम, अंदरसुल आदीसह परिसरातील गावांना आजच्या, पावसाने पुन्हा एकदा तडाखा दिला आहे. या पावसाने मका, सोयाबीन, कांदा व कांद्याची रोपे पुन्हा पाण्याखाली गेली आहेत. तर वादळी वाऱ्यामुळे मका पिक जमीनदोस्त झाले आहे. आता उभ्या पिकांच्या नुकसानीने शेतकरी अक्षरशः धास्तावला आहे.
आता ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. तर झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी जलहक्क संघर्ष समिती व कर्जमुक्त शेतकरी अभियानचे संयोजक भागवतराव सोनवणे यांनी केली आहे.





