Thursday, April 16, 2026
HomeराजकीयNCP demands : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अन्…; राष्ट्रवादी शरद पवार...

NCP demands : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अन्…; राष्ट्रवादी शरद पवार गटाची मागणी

मुंबई । Mumbai

महाराष्ट्रात गेल्या काही तासांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. आज सकाळपासून वरुणराजाने जोरदार हजेरी लावली असून, मुंबई, पुणे यासह राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. हवामान खात्याने या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीवर चिंता व्यक्त केली आहे. गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि मुंबई परिसरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. “अनेक ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत, आणि जिथे पंचनामे झाले, तिथे अद्याप मदत पोहोचलेली नाही,” असे शिंदे यांनी नमूद केले. त्यांनी राज्य सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति शेतकरी 50 हजार रुपयांची तातडीची मदत देण्याची मागणी केली आहे.

शशिकांत शिंदे यांनी पावसानंतर शहरातील व्यवस्था कोलमडल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. रस्त्यांवरील खड्डे, पाणी साचणे आणि वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. त्यांनी प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन केले.

राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. शशिकांत शिंदे यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “महायुती सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘वेळ आली तर कर्जमाफी करू,’ तर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरसकट कर्जमाफी शक्य नसल्याचे सांगितले. ही परस्परविरोधी विधाने शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत,” अशी टीका शिंदे यांनी केली.

शशिकांत शिंदे यांनी सरकारला इशारा देताना म्हटले की, जर लवकरच सरसकट कर्जमाफी जाहीर झाली नाही, तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन उभारले जाईल. “शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा कार्यान्वित केल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तरीही, पावसाचा जोर आणि नुकसानीचे प्रमाण पाहता सरकारवर तातडीने उपाययोजना करण्याचा दबाव वाढत आहे.

हवामान खात्याने पुढील 24 तासांतही जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने एकजुटीने काम करण्याची गरज आहे.

ताज्या बातम्या

चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai राज्य सरकारने गुरुवारी चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. जलजीवन मिशनचे संचालक जी. श्रीकांत यांची बदली छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त...