Wednesday, May 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadanavis: "भाषेच्या नावाखाली गुंडगिरी खपवून घेणार नाही…"; देवेंद्र फडणवीसांचा मनसेला इशारा

Devendra Fadanavis: “भाषेच्या नावाखाली गुंडगिरी खपवून घेणार नाही…”; देवेंद्र फडणवीसांचा मनसेला इशारा

पुणे | Pune
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादाने आता मराठी विरुद्ध अमराठी असे रूप घेतले आहे. त्यातच मराठीत न बोलल्याने मीरारोड येथे एका दुकानदाराला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध व्यावसायिक आणि केडियोनॉमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी मराठीप्रेमींना डिवचणारे विधान केले आहे. ‘मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा’, असे केडिया यांनी एक्सवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये राज ठाकरे यांना टॅग करत म्हटले. या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

गुंडशाहीवर कारवाई केली जाईल
मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्याला मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच, मराठी भाषेचा अभिमान असणे चुकीचे नाही, पण भाषेच्या नावाखाली गुंडगिरी खपवून घेणार नाही. भाषेवरुन वाद घालणाऱ्या, मारहाण करणाऱ्या आणि गुंडशाहीवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

- Advertisement -

“भाषेवरून मारहाण करणे हे अतिशय चुकीचे आहे. आम्ही मराठी आहोत, आम्हालाही मराठीचा अभिमान आहे. पण एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. उद्या आपली अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या राज्यात व्यवसाय करतात. त्यामधील आपल्या अनेक माणसांना तेथील भाषा येत नाही. मग त्यांच्याशी पण अशाच प्रकारे वागणूक मिळाली तर? भारतामध्ये अशा प्रकारची गुंडगिरी ही योग्य नाही. अशा प्रकारची गुंडगिरी कोणी केली तर त्यावर योग्य कारवाई केली जाईल”, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मीरा भायंदर येथील व्यापाऱ्यास मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. एखादा मराठी व्यापारी आसाममध्ये जाऊन भाषा शिकायला वेळ लागत असेल तर त्याला मारहाण करणार का, असा सवालही फडणवीसांनी उपस्थित केला. खरा अभिमान असेल तर मराठी भाषा शिकवा, क्लासेस घ्या, इंग्रजीला का मग गळे लावता. स्वत:च्या मुलांना इंग्रजी शाळेत टाकायचे आणि मराठीसाठी गळा काढायचा, असे म्हणत ठाकरे बंधूंवर अप्रत्यक्षपणे टीका केली.

“भाषेवरून कोणी मारहाण करत असेल तर हे सहन केले जाणार नाही. ज्या प्रकारची घटना घडली आहे, त्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि कारावाई केली आहे. यापुढेही अशा प्रकारे भाषेवरून कोणी वाद केला तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. भारतातील कोणत्याही भाषेवर अशा प्रकारे अन्याय केला जाऊ शकत नाही, हे देखील आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. हे लोक इंग्रजीला जवळ करतात आणि हिंदीवरून वाद करतात. मग हा कोणता विचार आहे? त्यामुळे अशा प्रकारे जे लोक कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल”, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

पडसाद : भूसंपादनात अतिरेक नको तर सामंजस्य हवे!

0
सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिकच्या विकासाच्यादृष्टीकोनातून दर बारा वर्षांनी येणारी महापर्वणी असते, यावर कोणाचेही दुमत होणे शक्य नाही. त्यामुळेच सिंहस्थ येण्याच्या पाच ते सहा वर्षे...