नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आजपासून (मंगळवार) बारावीच्या लेखी परीक्षा (12th Exam) सुरु होत असून, विभागात २८५ केंद्रावर १ लाख ७३ हजार विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) ८१ हजार ९७३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने यंदा कॉपीमुक्त परीक्षा अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी व्यापक तयारी केली आहे. दरम्यान जिल्ह्यातील संवेदनशील, अतिसंवेदनशील आणि उपद्रवी परीक्षा केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त तैनात राहणार असून केंद्राच्या बाहेर व्हिडिओ चित्रीकरण देखील केले जाणार आहे.
तसेच परीक्षा केंद्रावर (Exam Centre) बैठे पथक लक्ष ठेवणार असून ९ भरारी पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. ही पथके जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्राना भेटी देणार आहेत. तसेच दक्षता समितीची भरारी पथकेही कोणतीही पूर्व सूचना न देता आकस्मिकपणे परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत. ज्या परीक्षा केंद्रांवर या वर्षी सीसीटीव्ही नसेल, अशी परीक्षा केंद्र पुढील वर्षापासून बंद केली जाणार आहे.
विभागातील २८५ पैकी २६२ केंद्रावर सीसीटीव्ही
विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील २८५ पैकी २६२ परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत, उर्वरित २३ परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही नसल्याने या केंद्रावरील सर्व कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली आहे. कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी शिक्षण, महसूल, जिल्हा परिषद संलग्न विभाग एकत्रितपणे प्रयत्नशील आहे.
भरारी पथकात यांचा समावेश
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी,विभागीय शिक्षण उपसंचालक,प्रचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेतील वर्ग २ अधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक, प्राथमिक,योजना), उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) तसेच शिक्षण विभागातील महिला अधिकारी वर्ग २ अथवा वर्ग २
शाखा निहाय विद्यार्थी – विज्ञान ९६,६२५, कला ५४,८८१,वाणिज्य १९,०६३, व्यावसायिक २,९४३, तांत्रिक विज्ञान शाखा १७९.
जिल्हानिहाय विद्यार्थी संख्या – नाशिक ८१,९७३ जळगाव ४८,३०३, धुळे – २४,९०९, नंदुरबार १८,१४०.
विभागनिहाय केंद्र, परिरक्षक संख्या
नाशिक-१२९-२७
जळगाव-८२-१७
धुळे-४६-०८
नंदुरबार-२८-०८
एकूण २८५-६०
परीक्षा म्हणजे आयुष्याचा शेवट नसून एका सुंदर प्रवासाची ही सुरुवात आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही दडपणाशिवाय आत्मविश्वासाने या परीक्षेला सामोरे जावे.
दादा भुसे, शालेय शिक्षण मंत्री





