अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात यंदा बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्तसाठी प्रशासनाने मोठी तयारी केली. मात्र, शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील दहावी- बारावीच्या परीक्षेतील कॉपीची परंपरा या वर्षीही कायम असल्याचे दिसून आले आहे. जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाने बारावीच्या पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला 45 पथके तयार करून त्याव्दारे परीक्षा केंद्रांना भेटी परीक्षेवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही पाथर्डी तालुक्यात 7 तर शेवगाव तालुक्यातील 2 अशा कॉपी केेसेस समोर आल्या आहेत.
दरम्यान, बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात व नगर शहरासह तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागात एकूण 116 परीक्षा केंद्र होती. या ठिकाणी 62 हजार 462 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात परीक्षेला 61 हजार 319 विद्यार्थी हजर होते. 1 हजार 143 विद्यार्थी गैरहजर होते. यंदापासून जिल्ह्यात पहिल्यांदा बारावीच्या संवेशनशील 38 केंद्रांसह कॉपी होणार्या केंद्रांवर वरिष्ठ अधिकार्यांचे बैठे पथक तैनात होते. तसेच सात भरारी पथक देखील परीक्षेच्या काळात वेगवेगळ्या केंद्रांना भेट फिरतांना दिसत होते. दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपी रोखण्यासाठी जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांना संरक्षण भिंती, तसेच परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. याशिवाय केंद्रावरील प्रत्येक पर्यवेक्षकांचा मोबाईल झूम अॅपच्या माध्यमातून जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षाला जोडण्यात आले होते. त्या ठिकाणाहून पहिल्या टप्प्यात काल 38 संवेदनशील केंद्रांचे थेट चित्रिकरण करण्यात आले.
गैरहजर विद्यार्थी
नगर शहर 76, नगर ग्रामीण 43, श्रीरामपूर 53, कोपरगाव 34, पाथर्डी 221, कर्जत 38, अकोले 80, शेवगाव 73, नेवासा 54, राहुरी 35, पारनेर 51, जामखेड 41, राहाता 59, नगर शहर 78, नगर ग्रामीण 11, संगमनेर 32, नेवासा 33, संगमनेर 54 यांचा समावेश आहे.




