पुणे | वृत्तसंस्था | Pune
फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला आहे. यात पुन्हा एकदा राज्यात मुलींनी बाजी मारली आहे. तर राज्याचा निकाल ९१.८८ टक्के इतका लागला आहे. दुपारी १ वाजेपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.
यंदा बारावीची परीक्षा दरवर्षीपेक्षा १० दिवस लवकर घेण्यात आली. ११ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत ही परीक्षा सुरळीत पार पडली. राज्यभरातून १५ लाख विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यात ८,१०,३४८ मुले आणि ६,९४,६५२ मुलींचा समावेश होता. यावर्षी मुलींचा निकाल ९४.५८ टक्के तर मुलांचा निकाल ८९.५१ टक्के इतका लागला आहे.
यंदा राज्यात कोकण विभागाचा ९६.९४ टक्के सर्वाधिक निकाल लागला असून, सर्वात कमी लातूर विभागाचा लागला आहे. तसेच पुनर्परीक्षेचा निकाल ३७.६५ टक्के आणि दिव्यांगाना सवलतीचे गुण देण्यात आले आहेत. तसेच या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.८८ टक्के इतकी आहे.
येथे निकाल पाहता येणार
mahahsscboard.in
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
sscboardpune.in
sscresult.mkcl.org
hsc.mahresults.org.in
निकाल कसा पाहायचा?
* सर्वांत आधी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
* होमपेजवर ङ्गमहाराष्ट्र एसएससी / एचएससी निकाल २०२५फलिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.
* क्लिक करताच नवीन विंडो उघडेल, त्या ठिकाणी तुमचा सीट क्रमांक टाका. सोबत आईचे नाव भरुन सबमिट बटनावर क्लिक करा.
* त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. निकालाची प्रत डाऊनलोडही करता येईल.