बारामती | Baramati
संपूर्ण पवार कुटुंबाने एकत्र यावे, ही अजितदादांची इच्छा होती. अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. मात्र, एक परिवार म्हणून मी सुनेत्रा काकींमध्ये अजितदादांना पाहतो. त्यांना उपमुख्यमंत्रीपद आणि अजितदादांकडील सगळी खाती मिळावीत, ही आमची इच्छा होती. आता सुनेत्रा वहिनीच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या पाहिजेत, असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले. ते बारामती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, अजित पवार विमान अपघाताबाबतच्या शंका आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडींबाबत १० आणि १२ फेब्रुवारी रोजी अनेक गोष्टी लोकांसमोर ठेवणार असल्याचे सांगितले.
आमच्या डोक्यात कुठलाही राजकीय विचार येत नव्हता
मागील काही दिवसांत पवार कुटुंबीयांच्या झालेल्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? याबाबत पवार कुटुंबात काही चर्चा झाली आहे का? असा सवाल विचारला असता रोहित पवार म्हणाले, “याबाबत काहीही चर्चा झाली नाही. जेव्हा ही दु:खद घटना घडली. तेव्हा काही दिवस आम्हाला काहीही सुचत नव्हते. आमच्या डोक्यात कुठलाही राजकीय विचार येत नव्हता. पण मनात एक मात्र होते की अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, पण सुनेत्राकाकींकडे बघत असताना, त्या एक परिवाराचा भाग म्हणून सुनेत्रा काकींमध्ये मी अजित काकांना बघतो.”
या दुःखाच्या प्रसंगी परिवार १३ दिवस एकत्रित आहे
अजितदादांची मनापासूनची इच्छा होती की, पवार कुटुंबातील सर्वजण परिवार म्हणून सगळे एकत्र आले पाहिजेत. त्यासाठी दादांकडून प्रयत्न केला जात होता. ‘सुप्रिया ताई पवार साहेब अम्ही सर्वजण असाच काहीसा प्रयत्न करत होतो. या दुःखाच्या प्रसंगी परिवार १३ दिवस एकत्रित आहे. अजित पवार यांना देखील परिवार म्हणून आपण एकत्रित असले पाहिजे असे वाटत होते. आज न ठरवता सर्वजण एकत्र आले. त्यांनी काटेवाडीला मतदान केले. कुटुंब एकत्र आलेले आपण पाहतोय.’
९ तारखेनंतर सगळ्याला सुरवात होईल
अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यामुळे आम्हाला कोणालाही काही सूचत नव्हते. त्यामुळे आमच्या मनात कोणतेही राजकीय विचार आले नव्हते. आता या धक्क्यातून बाहेर पडून आम्ही राजकीय विचार करायला सुरुवात करु. पवार कुटुंबीयांमध्ये आतापर्यंत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. 9 तारखेनंतर या सगळ्याला सुरुवात होईल, असे रोहित पवार यांनी सांगितले.
12 तारखेला दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत काय ठरलं होतं, हे सांगणार
सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर रोहित पवार यांनी बोलणे टाळले. मी फक्त 10 फेब्रुवारीला अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत असणाऱ्या काही शंका उपस्थित करणार आहे. तर 12 तारखेला मी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत काय ठरलं होतं, हे सांगणार आहे. आम्ही विलीनीकरण का करणार होतो, दादांच्या आणि आमच्या मनात नेमकं काय होतं, हे मी सांगणार आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




